मागील चार दिवसांपासून कोसळणा-या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्याच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे.
अलिबाग- मागील चार दिवसांपासून कोसळणा-या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्याच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. विशेषत: जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाने चांगलाच जोर धरला असून सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
जिल्ह्यातील २८ पैकी २६ धरणे भरुन वाहू लागली असून महाड, रोहा, नागोठणे या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
जुलै महिन्याअखेपर्यंतच ७४.२५ टक्के पाऊस पडला नद्यांच्या पुराचे पाणी शहरात घुसण्याची भीती व्यक्त होत आहे. बोटी व बचावपथकांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोठया मदतीची गरज भासल्यास जिल्हा प्रशासनाने लष्कराशीही संपर्क ठेवला आहे. मुसळधार पावसामुळे भिरा धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले.
यंदाच्या पावसाळयात १७ बळी
रायगड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळयात आत्तापर्यंत १७ जणांचे बळी गेले आहेत. ६० जनावरे मृत्युमुखी पडली असून २६४ घरे, ३४ झोपडया आणि ३५ गोठे पडले आहेत. या सगळयात आत्तापर्यंत १ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.