भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये झालेली पहिली कसोटी अनिर्णीत राहिली. यजमानांना सलग पाचव्या विजयापासून रोखण्यासह प्रतिस्पर्धी संघाने आश्वासक सुरुवात केली. त्यामुळे अॅलिस्टर कुक आणि सहका-यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. विराट कोहली आणि कंपनीसाठी हा धोक्याचा इशारा ठरू शकतो.
राजकोटमध्ये प्रथमच झालेला कसोटी सामना आणि मायदेशात प्रथमच डिसिजन रिव्हय़ू पद्धतीचा (डीआरएस) वापर यांच्यामुळे पहिल्या कसोटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. ‘डीआरएस’चा फटका कुणालाच बसला नाही. मात्र राजकोट स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारतीय संघाची कामगिरी ढेपाळली.
इतकी ढेपाळली की, इंग्लंड आणि भारताचा पहिला डाव लांबला नसता तसेच प्रतिस्पर्धी गोलंदाजांना आणखी एक सत्र (किमान ३० षटके) मिळाले असते तर सामना निकाली ठरला असता. तसेच निर्णय हा भारताच्या विरुद्ध गेला असता.
इंग्लंडने पहिल्या डावात ५३७ धावांचा डोंगर उभारला. तसेच दुसरा डाव ३ बाद २६० धावांवर घोषित केला. भारताला आघाडी घेता आली नसली तरी ४८८ धावा करताना त्यांनी प्रतिस्पध्र्याना मोठया आघाडीपासून रोखले. दुस-या डावात मात्र यजमानांची पाचव्या आणि अंतिम दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या ६ बाद १७२ धावा झाल्या होत्या. एका क्षणी ५ बाद ११८ धावा अशा बिकट अवस्थेत भारत होता.
मात्र कर्णधार विराट कोहलीसह अष्टपैलू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाने उपयुक्त फलंदाजी करत प्रतिस्पध्र्याना विजयापासून रोखले. सामना अनिर्णीत कसा राखायचा, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे, असा भारताचा कर्णधार कोहलीने सामना संपल्यानंतर सांगितले. कसोटी ‘ड्रॉ’ झाली तरी संघ पराभवाच्या छायेत होता, हे यजमान संघनायकाने विसरून चालणार नाही. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारताचा संघ प्रथमच ‘बॅकफुट’वर गेलेला पाहायला मिळाला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका थोडीथोडकी नव्हे तर तब्बल पाच सामन्यांची आहे. गेल्या दोन वर्षात भारताचा संघ इतकी मोठी मालिका खेळलेला नाही. पाच लढतींची ‘टेस्ट सीरिज’ म्हटल्यानंतर क्रिकेटपटूंचा कस लागणार, हे निश्चित आहे. कोहली आणि सहका-यांना पाच सामन्यांची मालिका खेळण्याचा मोठा अनुभव नसला तरी इंग्लंड संघाला मोठया मालिका खेळण्याचा अनुभव आहे. त्यांच्यात आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारी ‘अॅशेस’ कसोटी मालिका पाच सामन्यांची असते.
क्रिकेट नव्हे तर कुठल्याही खेळात ‘झाले गेले विसरून’ नव्याने सुरुवात करायची असते. मात्र मागील चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याचीही खबरदारी घ्यायची असते. इंग्लंडचे क्रिकेटपटू गेले दोन-तीन महिने आशिया खंडात आहे. बांगलादेश दौ-यानंतर ते थेट भारतात आलेत. लागोपाठच्या दौ-यांमुळे क्रिकेटपटू थकण्याची शक्यता वाढते. त्यातच बांगलादेशविरुद्धच्या दुस-या आणि अंतिम कसोटीतील पराभवानंतर इंग्लंड संघ दडपणाखाली होता. मात्र आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताविरुद्ध त्यांनी आश्वासक सुरुवात केली.
राजकोट कसोटी भारताची फलंदाजी अगदीच खराब झाली नसली तरी लौकिकाला साजेशी झालेली नाही. मुरली विजय, चेतेश्वर पुजाराने खेळपट्टीवर थांबण्याचे धाडस दाखवले. कर्णधार विराट कोहलीने दुस-या डावात जबाबदारीने खेळ केला. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या अष्टपैलूंमुळे निभावून नेले तरी अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेला सातत्य राखता आलेले नाही.
फलंदाजी एक वेळ ठीक आहे. मात्र गोलंदाजीमध्ये वेळीच सुधारणा आवश्यक आहे. संपूर्ण कसोटीत भारताचे गोलंदाज प्रतिस्पध्र्याच्या केवळ १२ विकेट घेऊ शकले. त्यासाठी थोडयाथोडक्या नव्हे तर ७९७ म्हणजे जवळपास आठशे धावा मोजाव्या लागल्या. विकेट आणि धावांचा हिशोब पाहता यजमानांनी प्रत्येक विकेटसाठी ६० हून अधिक धावा मोजल्या. ही निश्चितच चिंताजनक बाब आहे.
भारताची गोलंदाजीची भिस्त स्पिनर्सवर असते. मात्र हुकमी एक्का अश्विनने तीन विकेट घेतल्या. तो महागडा ठरला. त्याने २३० धावा मोजल्या. डावखु-या जडेजाने अचूक मारा केला तरी लेगस्पिनर अमित मिश्राला इंग्लंडच्या गोलंदाजांनी सहज खेळून काढले. अश्विनला खेळून काढता आले, हा पाहुण्या फलंदाजांचा मोठा विजय आहे. त्यामुळे उर्वरित चार सामन्यांत गोलंदाजी उंचवायची असेल तर भारताच्या फिरकीपटूंना गोलंदाजीत नवे पर्याय वापरावे लागतील.
भारताचे फलंदाज आणि गोलंदाज अपयशी ठरले तरी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी एकही सराव सामना न खेळता उंचावलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांचेही प्रमुख फलंदाज फार मोठी खेळी करू शकले नाहीत. मात्र मोईन अली आणि बेन स्टोक्स या अष्टपैलूंनी फलंदाजी सावरली. अनुभवी ऑफस्पिनर मोईन अलीने गोलंदाजीमध्ये निराशा केली तरी लेगस्पिनर अदिल रशिदने छाप पाडली. वेळीच अभ्यास केला नाही तर भारतासाठी तो अडचण ठरू शकतो.
घरच्या मैदानावर खेळण्याची आणि सर्वोत्कृष्ट कामगिरीची भारताला सवय आहे. मात्र यावेळचा प्रतिस्पर्धी कडवा आहे. त्यांनाही पारंपरिक कसोटी क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे भारताने वेळीच चुका सुधारून मायदेशातील आपले वर्चस्व अबाधित राहावे, हीच अपेक्षा.