पुणे आणि लातूर जिल्ह्यातील १४ नगर परिषदांसाठी बुधवारी सरासरी ७२ टक्के मतदान झाले असून गुरुवारी दुपारपर्यंत येथील निकाल हाती येतील.
मुंबई- पुणे आणि लातूर जिल्ह्यातील १४ नगर परिषदांसाठी बुधवारी सरासरी ७२ टक्के मतदान झाले असून गुरुवारी दुपारपर्यंत येथील निकाल हाती येतील. या दोन्ही जिल्ह्यांत थेट नगराध्यक्षपदाच्या १४ आणि सदस्यपदाच्या एकूण ३२४ जागांसाठी मतदान झाले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते अमित देशमुख आणि भाजपा मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांची प्रतिष्ठा या भागांत प्रणाला लागली आहे. पुणे जिलतल्या १० नगरपालिकांपैकी आळंदी मध्ये यंदाच्या नगरपालिका निवडणूकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगला होता.
गेली १० वर्षे आळंदीत शिवसेनेची सत्ता आहे. यावेळी भाजपाकडून शिवसेनेला कडवे आव्हान देण्यात आले. भाजपाने २ जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. त्यामुळे निकालापुर्वी तरी भाजपाचे पारडे जड असल्याचे येथे चित्र होते.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून वैजयंती कांबळे, शिवसेनेकडून भाग्यश्री रंधवे, बसपकडून डॉक्टर मनिषा रंधवे आणि काँग्रेस पुरस्कृत आशा गायकवाड यांच्यासह ८ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तळेगावमध्येही नगरपालिकेसाठी शांततेत मतदान पार पाडले. नागरिकांकडून मतदानाला सकाळपासूनच मतदारांनी उत्साहात हजेरी लावली होती. उद्या दुपापर्यंत येथील चित्र स्पष्ट होईल. इंदापूर, दौड, सासवड, जुन्नर, तळेगाव-दाभाडे आणि लोणावळा या सहा पालिकांमध्ये मोठी चुरशीची लढती होती.
इंदापुरात काँग्रेसविरुध्द राष्ट्रवादी, दौंडमध्ये राष्ट्रवादी विरूध्द काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष, सासवडमध्ये काँग्रेसविरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आघाडी तर तळेगाव दाभाडे आणि लोणावळा येथे भाजपाविरुध्द राष्ट्रवादी अशी लढत आहे.
लातूर जिलतील औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर नगरपरिषदेच्या चार नगराध्यक्षपदासाठी ३८ तर १०१ नगरसेवकांच्या जागांसाठी ५०१ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी सात तर, नगरसेवकांच्या २० जागांसाठी १०० उमेदवार रिंगणात आहेत.