पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव या तीन महानगरपालिकांसाठी २४ मे रोजी मतदान होणार असून २६ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
मुंबई- पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव या तीन महानगरपालिकांसाठी २४ मे रोजी मतदान होणार असून २६ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या महापालिका क्षेत्राअंतर्गत आजपासून आचारसंहिताही लागू झाली आहे.
या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी वापरली जाणार आहे, असे सहारिया यांनी नमूद केले.
नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत २९ एप्रिलपासून ६ मेपर्यंत असेल. रविवार, ३० एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील; परंतु १ मे दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते.
विशेष म्हणजे नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची मुदत १० जून रोजी संपत आहे. तर मालेगाव महानगरपालिकेची मुदत १४ जूनला संपणार आहे.