निवडणुकीचा आठवडी बाजार सुरू झाला आहे. आठवडी बाजारात जशी गर्दी उसळते, त्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या खेळीत अपक्षांची गर्दी उसळली आहे. २५ वर्षे एकत्र राहिलेले एकमेकांचे गळे धरायला निघाले आहेत.
तिकडे मंत्रालयात सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलेले एकमेकांच्या मांडीचे रक्त प्यायला शब्दांची गदा हातात घेऊन आसुसलेले आहेत. या लोकशाहीतील निवडणुका आहेत की, आखाडय़ातल्या मारामा-या आहेत. इतक्या टोकाच्या भूमिका राजकीय पक्ष घेत आहेत. लोकशाहीची निवडणूक कशाकरिता? आपल्या पक्षाचा नेमका कार्यक्रम काय? २५ वर्षे सत्तेत असताना आम्ही काय केले हेही कोणाला सांगता येत नाही. मुंबई कशी बकाल आहे. यावर कोणी बोलत नाही. तू मोठा, की मी मोठा, तू शहाणा, की मी शहाणा. अशी कुरघोडीची स्पर्धा लागली आहे.
जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. या पूर्वीच्या निवडणुकीत प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याचे किती वचने अमलात आली, कोणाला काही सांगता येत नाही. कोणी ‘वचननामा’ म्हणत आहे. कोणी आपल्या पक्षाचा ‘जाहीरनामा’. कुणी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून देत आहे. कोणी नगरसेवक लाच घेताना पकडला जात आहे. कोणी नगरसेवक आपल्या पत्नीला तिकीट मिळाले नाही म्हणून दुस-या पक्षात उडी मारून लगेच पक्षांतर करत आहे.
बंडखोरी तर एवढी मोठी आहे की, या बंडोबांना थंड करता करता राजकीय पक्षांचा दम निघाला आहे. मुंबई महापालिकेच्या जागा २२७, उमेदवार २२७६. एवढय़ा भाऊगर्दीत बंडखोर किती याचा आकडा नाही. जे बंडखोर आहेत ते अपक्ष झाले. अपक्ष म्हणजे भुरटे. आता यातल्या ९९ टक्के अपक्षांची डिपॉझिट जाणार आहेत. अगोदर बंडखोरी मग बंडखो-यांना थंडोबा करताना नेत्यांची धावपळ. आता प्रचार सुरू झाला आहे, पण या प्रचारात विचार कुठेच नाही. पूर्वीच्या निवडणुकीत प्रत्येक सभा नुसती प्रचारसभा नव्हती, ती विचारसभा असायची. आता विचाराशी राजकीय पक्षांचा काहीही संबंध राहिला नाही. आचाराचाही संबंध राहिलेला नाही. फक्त एकमेकांना हाणण्यासाठी उच्चारांचा संबंध आहे.
आता सध्याचे दोन पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. त्यात प्रामुख्याने सेना-भाजपा आहे. २५ वर्षे एकमेकांच्या गळ्यात गळे घातले. सपाटून हात मारून घेतला, मुंबई महापालिका पारदर्शक असेल, पण पालिकेतील सत्ताधारी कुठे पारदर्शक आहेत! जर ते पारदर्शक असते, तर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे ही वेळ का आली असती? आता जे २५ वर्षे गळ्यात गळे घालतात. ते म्हणतात, ‘तुम्ही भ्रष्ट आहात’ मग हे म्हणतात, ‘अहो तुमच्या दिल्लीतल्या सरकारने आम्हाला धुतल्या तांदळाचे प्रमाणपत्र दिलेले आहे.’ भाजपाचे नशीब कसे खोटे आहे बघा, हे इकडे एकमेकांवर घाव घालतात आणि दिल्लीचे सरकार शिफारस पत्र देते. इकडे भाजपावाले भ्रष्टाचाराविरुद्ध भाषणे देत आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे नेते तिकीट वाटप करताना २-२ लाख रुपये मागताहेत.
इतकी पारदर्शकता की शब्दांचा जप आणि तिकडे २-२ लाखांची मागणी. तिकडे आंबेजोगाईत ३ कोटींच्या भ्रष्टाचाराबद्दल भाजपाच्या नेत्याला ५ वर्षाची सक्तमजुरी. इकडे भाजपाचे नेते पारदर्शक-पारदर्शक अशा शब्दांवर जोर देत आपल्या चारित्र्याचा डंका पिटीत असताना, तिकिटासाठी २ लाख घेण्यामुळे आणि त्यांचेच नेते तुरुंगात जाण्यामुळे भाजपाच्या कमरेचे सगळेच सुटले. काय झाकावे आणि कसे झाकावे. मोठय़ा अवघड स्थितीत आज भाजपा आहे. तिकडे शिवसेनेची नगरसेविका १६ हजारांची लाच घेताना पकडली जाते. राजकारणात काय काय मजा चालू आहे. लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा, पारदर्शक शब्दाचा वापर करून भ्रष्ट असलेला भाजपा आणि तिकडे लाच घेणारी नगरसेविका कोणाला झाकावे आणि कोणाला काढावे, अशी सगळी एक भयानक स्थिती या मुंबईत अवतरली आहे. लोकशाहीच्या निवडणुकीचे पावित्र्य निवडणुकीत कुठे दिसत नाही. मुंबईभर एक दांडगाईचे वातावरण आहे. या दांडगाईच्या वातावरणातच पुढचे पंधरा दिवस मुंबईभर धुमाकूळ घातला जाणार आहे.
आज दिसायला तरी असे दिसते आहे की, मुंबईतली निवडणूक जणू सेना आणि भाजपा यांच्यातच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचा सध्या तरी मुंबईत पत्ता नाही. काँग्रेसमध्ये रुसवे-फुगवे चालू आहेत. आता म्हणे गुरुदास कामत यांची समजूत काढण्यात आली आणि ते प्रचाराला उतरायला तयार झाले. समजूत पटण्यासाठी गुरुदास कामत हे काही कुकुलं बाळ आहेत का? काँग्रेस पक्षाला आज भाजपाने घेरले आहे. सत्तेचा उन्माद अंगात आल्यासारखी काँग्रेस संस्कृती नष्ट करण्याची भाषा भाजपावाले बोलत आहेत. भाजपाचा आलेख घसरत असताना आपसातले मतभेद विसरून हल्लाबोल करण्याच्या तयारीत काँग्रेसने रस्त्यावर उतरायला हवे होते. आपसातील भांडणे, अहंकार आणि त्या अहंकाराने पक्षाचे नुकसान करायला निघालेले, पक्षावर काळवेळ काय आहे ते समजून घेत नाहीत. ही वेळ भांडणाची नाही. एकत्र येऊन हल्ला करण्याची आहे. सेना-भाजपा कुठेही असताना काँग्रेस, राष्ट्रवादीला एवढे जर कळले असते, तर कुठचाही प्रतिष्ठेचा प्रश्न न करता काँग्रेस-राष्ट्रवादीने जागांवर अडून न बसता आघाडी केलीच असती, पण काँग्रेसला शत्रूच कळत नाही आणि राष्ट्रवादीला काँग्रेसच शत्रू वाटतो. मग या अनुकूल संधीमध्ये फायदा घेणार कोण, महाभारतात कौरव- पांडव एकमेकांविरुद्ध लढले, पण बाहेरच्या शत्रूसोबत लढताना ‘आम्ही ५ नव्हे १०५’ आहोत, असे पांडवांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर शत्रू एवढा आक्राळविक्राळ आहे. नोटाबंदीनंतरच्या सगळ्या नव्या नोटा भाजपावाल्यांच्या ताब्यात अगोदर आल्या असाव्यात, म्हणून गोव्यात पैशांचा पाऊस पडला. आताही मुंबईत तेच होईल. म्हणून ज्यांना राजकीय शत्रू समजत नाहीत ते शाहू, फुले, आंबेडकरांचा जयजयकार करूनही मुंबईचे पुरोगामीपण टिकवायला एकत्र येत नाहीत. या दुर्दैवाला काय म्हणावे.
सेना-भाजपाला हाणायला सगळ्यात चांगली संधी आताच होती आणि आहे! जिल्हा परिषदांच्या निवडणुकांतसुद्धा २५ जिल्हा परिषदांपैकी किमान १६ ते १७ जिल्हा परिषदा निवडणुका आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढले तर, यश मिळवू शकतात. पण सांगणार कोण आणि ऐकणार कोण. सगळे अहंकाराने भरलेले आहेत. ते निरुपम छटाकभर, पण ज्येष्ठ नेत्यांना सन्मान द्यायलाही तयार नाहीत. या स्थितीमध्ये विरोधकांवर हल्लाबोल करण्याची इतकी चांगली संधी चालून आलेली असताना, ही संधी हातची दवडली. राजकारणात एकेक संधी मिळाल्यानंतर मात करता येते. भाजपाच्या मंत्रिमंडळातून बाहेर न पडता सेना-भाजपा रस्त्यावर एकमेकांचे शत्रू होतात आणि या सेना-भाजपा शत्रूचा पराभव करण्याकरिता काँग्रेस- राष्ट्रवादीवाल्यांना मित्र होता येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे की भाजपा-सेनेचे नशीब म्हणावे. मुंबईमध्ये आजही काँग्रेसच्या मागे लोक आहेत. पण लोकांच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत कुठे? त्यामुळे आपल्या हाताने परिस्थिती कशी खराब करून घ्यायची याची शिकवणी लावायची असेल तर निरुपम आणि अहिर या दोन गुरूंच्या शिकवण्या लावा.
आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या नेत्यांना आघाडीचे शक्तीचे महत्त्व कळले असते, तर त्यांनी धिंगाणा न घालता आघाडी करून तुटलेल्या सेना-भाजपा युतीला कडवे आव्हान उभे केले असते. दुर्दैवाने राष्ट्रवादीला हे कळत नाही आणि काँग्रेसला वळत नाही.