नाथाभाऊ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दोन महिने होऊन गेले. मला सत्तेची हाव नाही, असे ते सांगत आहेत. पण त्यांना राजीनामा द्यावा लागला, हे शल्य त्यांच्या मनात कुठेतरी काटय़ासारखे रुतून बसलेले आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या चांगल्या दिवशी मंत्रिपद गेल्याचा विषय त्यांनी काढला. त्यांच्या सगळ्या भाषणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरील राग शब्दाशब्दांत व्यक्त होत होता.
मुख्यमंत्र्यांमुळेच मंत्रिपद गेले, हे त्यांनी नाव न घेता स्पष्ट केले. त्यांच्या मनातील ती सल जाता जात नाही. हे खरेच आहे की, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांची नियुक्ती थेट मोदी आणि अमित शहा यांच्यामुळेच झाली. ज्येष्ठत्वाप्रमाणे एकनाथ खडसे यांचाच तिथे दावा होता.
गोपीनाथ मुंडे असते तर तेच मुख्यमंत्री झाले असते. कारण आताच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे खडसे सोडून बाकी सगळे मंत्री अगदी सुमार आहेत. महाराष्ट्र भाजपामध्ये दोनच नावे दमदार मानली गेली होती.. एक महाराष्ट्र घुसळून काढण्याची ताकद असलेले गोपीनाथ मुंडे आणि राज्य न घुसळता लोण्याची वाटी हातात असलेले गडकरी. दानवे, फडणवीस, मुनगंटीवार, तावडे आणि आता मंत्री झालेले फुंडकर ही दुस-या-तिस-या रांगेतील मंडळी आहेत.
महाराष्ट्र भाजपाजवळ सध्या दणकेबाज नेता एकच, तो म्हणजे नितीन गडकरी. दोन नंबरला खडसे.. शेवटी राजकीय नेत्याचा प्रभाव तो नेता किती आमदार-खासदारांना निवडून आणतो यावर मोजला जातो. पक्षाचे संघटन किती मजबूत करू शकतो यावरही ते मोजमाप होते. महाराष्ट्रात आज तरी भाजपाच्या वतीने विदर्भात ६४ पैकी ४४ आमदारांचा रतीब घालणारे नितीन गडकरी हेच मोठे नेते मानायला हवेत. खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात पक्ष उभा केला हे नाकारता येणार नाही. त्यांच्या मनातील मुख्य सल आहे की, माझ्याविरुद्ध एकही पुरावा नसताना मला राजीनामा का द्यावा लागला. हा प्रश्न ते जाहीर सभेत विचारतात.
वाढदिवसाच्या दिवशी विचारतात. पण याचे उत्तर लोक कसे देणार? याचे उत्तर खडसेंनाच द्यावे लागेल आणि पुरावा नाही, गुन्हा केला नाही तर मग तुम्ही राजीनामा दिला कशाला? तुम्ही स्पष्ट सांगायला हवे होते की, मी राजीनामा देणार नाही, मला हवे तर काढून टाका.. मग तो चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला असता. कारण मुख्यमंत्र्यांची शिफारस असल्याशिवाय राज्यपालाला मंत्रिमंडळ सदस्याला काढता येत नाही.
यापूर्वी शंकरराव चव्हाण यांनी वसंतदादा पाटील यांना मंत्रिमंडळातून काढले होते. त्यानंतर बॅरिस्टर अंतुले यांनी शालिनीताई पाटील आणि बाबुराव काळे यांना मंत्रिमंडळातून काढले होते. विलासराव देशमुख यांनी रणजीत देशमुख, हुसेन दलवाई यांना काढले होते. काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘गेम’ इतका व्यवस्थित केला की, खडसे त्यात बरोबर अडकले. जर खडसे यांचे मन आज असे सांगते आहे की, मी एकही चूक केलेली नाही तर त्यांनी राजीनामा द्यायला नको होता.
राजीनामा त्यांनीच देऊन टाकला आणि राजीनामा का द्यावा लागला? असे तेच विचारत आहेत. खडसे यांना बाजूला करून मुख्यमंत्र्यांनी गेम अशा पद्धतीने केला की, आता मंत्रिमंडळात त्यांना स्पर्धक राहिला नाही. मुनगंटीवार, तावडे, पंकजा मुंडे हे काही त्यांचे स्पर्धक नाहीत. एखाद्या सामन्यात बारावा खेळाडू असतो तसे हे आहेत. आता तीन वर्षे तरी मुख्यमंत्र्यांचा मार्ग निधरेक आहे. पण हे दिसायला सरळ गणित असावे तसे दिसते. पण धोका इथेच दडलेला आहे.
भाजपाचे अध्यक्ष दानवे हे मुख्यमंत्री व्हायला उत्सुक आहेत, आणि कोणी कितीही प्रयत्न केले तरी उद्या जेव्हा बहुजन समाजाचा दबाव वाढत जाईल तेव्हा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजपाला पर्याय राहणार नाही. २०१९ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १०० टक्के होणार नाही. मग नेतृत्व कुणाचे? नेतृत्व संघाचे.. आणि संघाच्या दृष्टीने आज महाराष्ट्रात नेतृत्वबदल करायची वेळ आली तर चंद्रकांत पाटील यांचा नंबर लागेल. ते नाकारोत न नाकारोत; त्या दिवशी खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात टकराव झाला असता.. त्यामुळे खडसे पद्धतशीर बाजूला केले गेले.
खडसे यांच्या मनात एक शल्य आहे की, मला मुख्यमंत्र्यांनी बाजूला केले. मुख्यमंत्र्यांनी फिल्डिंग लावली हे खरे.. ए.सी.बी.चे पोलीस खडसेंच्या भोवती सोडले. त्यांचा खास माणूस गजानन पाटील यांच्यावरही पाळत होती. हे सगळे मुख्यमंत्र्यांनी केले. गृहखाते त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी फिल्डिंग लावली. पण नाथाभाऊंच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की, जर मोदी आणि अमित शहा यांनी जरा जरी डोळे वटारले असते तरी मुख्यमंत्र्यांची पुढे जाण्याची हिंमत झाली नसती.
मुख्यमंत्र्यांनी जी काही फिल्डिंग लावली असेल आणि जे काही केले असेल ते पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष या दोघांच्या मान्यतेशिवाय ही फिल्डिंग लावणे शक्य नाही. कारण मुख्यमंत्रीच त्या दोघांच्या मेहरबानीवर आहेत. त्यामुळे केवळ ‘नवख्या पोराने काटा काढला’ हे विश्लेषण भाबडे आहे. खडसे यांचा काटा काढण्यासाठी नवख्या पोराला पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांनी फार छानपणे वापरले. जर मोदींनी असे म्हटले असते की ‘ये धंदे बंद करो.. खडसे मंत्रिमंडल मे रहेंगे’ तर काय हिंमत झाली असती.. एक तर मुख्यमंत्र्यांनी खडसेंना दूर करण्याची गरज श्रेष्ठींना पटवून दिली असली पाहिजे किंवा पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात खडसे कमी पडले असले पाहिजेत.
पण खडसे यांना एक गोष्ट सांगायला हवी की, राजीनामा झाल्यानंतर प्रत्येक सभेत, तुम्ही प्रत्येक ठिकाणी तीच रेकॉर्ड लावत बसलात तर तुमच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती हळूहळू संपुष्टात येईल. राजीनामा का द्यावा लागला याचा विचार खडसेंनीच करायचा आहे. सगळ्या संस्था कुटुंबाच्या ताब्यात ही गोष्ट त्यांना चुकीची वाटत नसेल तर मग त्यांना दोष कधीच दिसणार नाहीत. गिरीष महाजन यांच्या गावाकडे बोट दाखवून त्यांच्यावर खापर फोडले तर चार फुटांचे गिरीष महाजन एकदम मोठे होतात. कोण विचारतो त्या गिरीष महाजनांना? त्यांनाही वापरले गेले..
महाराष्ट्राच्या राजकारणात खडसे आणि गिरीष महाजन यांची तुलनाच होणार नाही. नवख्या पोरात गिरीष महाजनसुद्धा आहेत. तेव्हा नवख्या पोरांना कुणी वापरले याचा शोध खडसेंनी घ्यावा आणि इथून पुढे माझे मंत्रिपद गेले म्हणून जाहीरपणे रडण्याचा कार्यक्रम त्यांनी बंद करावा, हे त्यांच्या हिताचे आहे. मंत्रिपद गेले तर गेले.. त्याला किती महत्त्व देता.. आणि किती रडत बसता.. दोन-चार दिवस ठीक आहे.. रोज डमरू वाजवाल तर नाथाभाऊ तुमचे काही खरे नाही. अशी अवस्था निर्माण करा की, महाराष्ट्राच्या येणा-या राजकारणात बहुजन समाजाचा दबाव निर्माण केल्याशिवाय फडणवीसांचा राजीनामा होणार नाही. त्याच्याकरिता आता महाराष्ट्राची भूमी अनुकूल आहे.