वर्धा जिल्ह्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून एकाच दिवशी ५ हजार कोटींच्या कामांना सुरुवत होत आहे.
वर्धा- वर्धा जिल्ह्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून एकाच दिवशी ५ हजार कोटींच्या कामांना सुरुवत होत आहे. चौपदरी रस्ते, ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील उद्योगांना चालना मिळणार असून या विकासाला पुरक म्हणून सेवाग्राम विकासाचा २६६ कोटींचा आराखडा हाती घेण्यात आला आहे. या सर्व प्रयत्नांमधून इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या निर्मितीमधून स्थानिक युवकांना रोजगार हे एकमेव ध्येय समोर ठेवण्यात आले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्ट आणि सेवाग्राम विकास आराखडय़ातील कामांचे ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री तथा वित्त, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, सर्वश्री आमदार समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, माजी खासदार दत्ता मेघे, नगराध्यक्ष अतुल तराळे, सेवाग्रामच्या सरपंच श्रीमती रोशना जामलेकर, पवनारचे सरपंच राजेश्वर गांडोळे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ड्रायपोर्टची निर्मिती हे या परिसराला मिळालेले मोठे वरदान ठरणार आहे. या पोर्टच्या माध्यमातून प्रत्यक्ष पोर्टमध्ये मिळणा-या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आणि उद्योजक आपला माल थेट विदेशात पाठवू शकतील. यामुळे आयात-निर्यातीला चालना मिळेल. तसेच यातून मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पांत स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी ‘सिंबॉयसीस’च्या माध्यमातून कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात स्थानिक युवकांनाच प्रशिक्षित करून पोर्टमध्ये काम देण्यात येईल.
‘पोर्टलेट’चा विकास हा देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतो. वर्धा आणि जालना येथील ड्रायपोर्ट हे राज्यातील मागास भागाला विकसित करणारे प्रकल्प आहेत. रस्ते हे आर्थिक सुबत्तता आणतात. त्यामुळे रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे काम विदर्भात होत आहे. कार्गो हब, बुटीबोरी ते वर्धा आणि वर्धा ते यवतमाळ या चारपदरी रस्त्यामुळे या भागातील शेतमाल आणि औद्योगिक उत्पादने या ड्रायपोर्टपर्यंत सहज आणि जलदरीत्या पोहोचतील. देशातील एकर प्रणालीमुळे मालवाहतूक क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येत्या काळात नागपूर हे मालवाहतुकीचे केंद्र होणार आहे.
राज्याचे सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांवर नेणार
शेतक-यांच्या विकासासाठी सिंचन महत्त्वाचे आहे. राज्याचे ४० टक्के असणारे सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. महात्मा गांधींच्या जयंतीदिनी भविष्यातील नवीन भारत निमार्णाचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. खादी ग्रामोद्योग ही गांधीजींनी दिलेली देणगी आहे. त्यामुळे येत्या काळात खादीच्या उत्पादनाला व्यावसायिक जोड देण्याची आवश्यकता आहे. जगाच्या पाठीवर आज ज्यूट, रेशीम, कापूस, बांबू आणि लिनेन या पाच कच्च्या मालापासून सूत आणि कापड तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. याचा या परिसरातील नागरीकांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
[EPSB]
एक हजार महात्मा गांधी आणि १ लाख मोदी रस्त्यांवर उतरले तरी देश स्वच्छ करू शकणार नाहीत.
[/EPSB]