रायगडमधील खालापूर तालुक्यात नदीमध्ये पाचजण बुडाल्याची घटना घडली आहे.
रायगड- रायगडमधील खालापूर तालुक्यात नदीमध्ये पाचजण बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन महिलांचा आणि तीन मुलांचा समावेश आहे. ही घटना खालापूर तालुक्यातील पेण रोडवरील वावोशी शिरवली येथे बुधवारी सकाळी घडली. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
गौरी गणेश आरते (३३), तेजस्वीनी गणेश आरते (१०), तुषार गणेश आरते (७), मीनाक्षी वाकनिस (३१), शुभम मिलिंद वाकनिस (८) अशी बुडून मृत पावलेल्यांची नावे आहेत.
शिरवली येथील रहिवासी असलेले गौरी आणि मिनाक्षी मुलांना घेऊन कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. पोहोण्यासाठी मुले पाण्यात उतरली. आणि या दोन्ही महिला कपडे धुण्यात व्यस्त होत्या. मात्र काही वेळाने मुले पाण्यात बुडत असल्याचे त्या दोघींच्या निदर्शनास आले.
मुलांना वाचवण्यासाठी या दोघीही नदीत उतरल्या. मात्र त्यांना अपयश आले. या पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी खालापूर येथे पाठवण्यात आले आहेत.