आज रात्री आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा सहा महिन्याचा पगार कापला जाईल, असा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारने आंदोलनकर्त्या निवासी डॉक्टरांना दिला आहे.
मुंबई- निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या सामुहिक रजा आंदोलनामुळे रुग्णांचे चांगलेच हाल झाले आहेत. त्यामुळे बुधवार (२२ मार्च) रात्री ८ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा सहा महिन्याचा पगार कापला जाईल, असा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारने डॉक्टरांना दिला आहे.
निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यात आरोग्य सेवेवर कमालीचा परिणाम झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. आपल्या मागण्या एक महिन्याच्या आत पूर्ण केल्या जातील, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेऊन कामावर हजर व्हावे, अन्यथा पगार कापण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, डॉक्टरांच्या या आडमुठेपणाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. ‘मार खाण्याची भिती वाटत असेल तर नोकरी सोडा’ असा टोला न्यायालयाने लगावला होता. मात्र तरिही डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले नाही.
लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी सामोहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात मुंबईतील नायर, जे. जे., सेंट जॉर्ज, केईएम, कामा आणि उपनगरातील डॉक्टरांनी आंदोलनात भाग घेतला आहे. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे कमालीचे हाल होत आहेत. जे रुग्ण अगोदरपासून दाखल आहेत, त्यांची प्राध्यापक आणि कायम सेवेतील डॉक्टर काळजी घेत आहेत. परंतु नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यात खूप अडचणी येत आहेत.
निवासी डॉक्टरांचे ‘सामूहिक रजा’ आंदोलन