राज्यातील सार्वजनिक वैद्यकीय सेवेची पुरता बोजवारा उडालेला असताना विविध ग्रामीण भागांत असलेल्या जवळपास ५८१ डॉक्टर्सनी सरकारी वैद्यकीय सेवा सोडल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली.
मुंबई- राज्यातील सार्वजनिक वैद्यकीय सेवेची पुरता बोजवारा उडालेला असताना विविध ग्रामीण भागांत असलेल्या जवळपास ५८१ डॉक्टर्सनी सरकारी वैद्यकीय सेवा सोडल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली. सोमवारी मंत्रालयात पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्यातले उच्चशिक्षित शेकडो डॉक्टर्स सरकारी सेवेत काम करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक सेवा आणि त्यावर सरकारचा असलेला अंकुश याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर कोणतेही कारण न देता सेवा सोडून जाणे, आपल्या पदाचा राजीनामा न देणे आणि सरकारची परवानगी न घेता वैयक्तिक व्यवसाय करणे अशा वैद्यकीय अधिका-यांना सरकारने फरार घोषित केले आहे.
या फरार वैद्यकीय अधिका-यांपैकी आतापर्यंत १०४ जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच या डॉक्टर्सवर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल कौन्सिलकडे करण्यात आली होती.
सेवेत रुजू असताना कोणताही पत्रव्यवहार न करता सेवा सोडून गेल्यानंतर अशा अधिका-यांवर कारवाई करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची परवानगी आवश्यक असते. या विभागाच्या परवानगीनंतर या वैद्यकीय अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येते. त्यानुसार अद्याप ४७७ अधिका-यांवर कारवाई होणे बाकी असल्याचे आरोग्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
सेवा सोडून गेल्यानंतर अशा रिक्त जागांवर सरकारकडून त्वरित कायमस्वरूपी पद भरणे शक्य नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात पदे भरली जातात. त्यामुळे सेवेवर तितकासा परिणाम होत नाही. पुढच्या तीन महिन्यांत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी एमएसएमडी अर्हतेची ५४५ पदे भरण्यात येणार आहेत.
ट्राम सव्र्हिस आणि अन्य वैद्यकीय सेवेत १ हजार ३३२ पदे भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ‘क’ आणि ‘ड’ वर्गाची ३ हजार १८७ पदे पुढच्या काही महिन्यांत भरण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.