सातवा वेतन आयोग लागू करावाया यासह आपल्या इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अधिकच चिघळला आहे.
मुंबई- सातवा वेतन आयोग लागू करावा या यासह आपल्या इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अधिकच चिघळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वादगस्त वक्तव्य केल्याने कर्मचारी अधिकच संतप्त झाले आहे. कर्मचाऱ्यांना पाच वाजेपर्यंत कामावर हजर होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यांनी ते सपशेल धुडकावून लावले आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी
राज्यातील एसटीचे कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काल कामगार संघटनांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. चर्चेची तयारी पुढे सुरू होती. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटनांचे नेते आणि कामगारांबाबत वादग्रस्त विधाने केल्याने कर्मचारी अधिक संतप्त झाले आहेत. आंबाजोगाई येथे तर कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांचा पुतळा जाळून आपला निषेध नोंदविला. या संपात मान्यता प्राप्त संघटनेसह इतर सहा संघटना सहभागी झालेल्या आहेत. शिवसेनाप्रणित कामगार संघटना मात्र या संपात सहभागी झालेली नाही. शिवसेना प्रणित संघटनेने संप फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर संघटनांच्या कामगारांनी त्यांना बांगडय़ांचा आहेर केला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून परिवहन सचिव आणि अन्य अधिकारी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत आहेत. कामगारांनी पाच वाजेपर्यंत कामावर हजर व्हावे, अन्य कारवाई करू असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता. मात्र तो कामगारांनी सपशेल धुडकावून लावला आहे.
कामगारांचे नेते दलाली खातात! – रावते
एसटी कर्मचाऱ्यांचा संप त्यांच्या नेत्यांनाच मिटू द्यायचा नाही. हे नेते कामगारांच्या पगारात दलाली खातात, असा थेट आरोप करून आताच काय पुढील पंचवीस वर्षे सातवा वेतन आयोग लागू करता येणार नाही, असे वक्तव्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्यामुळे संप अधिकच चिघळला आहे. रावते म्हणाले की, औद्योगिक न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. एसटी महामंडळाची आर्थिक ताकद कमी असून किमान २५ वर्ष तरी एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लावता येणार नाही. एसटी कायम तोटय़ात असते. दिवाळीत प्रवाशांना वेठीसही धरू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला केले आहे. त्याप्रमाणे कामगारांनी कामावर हजर व्हावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही रावते म्हणाले.
[EPSB]
[/EPSB]