रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील सुवर्णगणेश दरोडा आणि दोघांच्या खून खटल्याच्या आरोपातून १२ पैकी दोन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
अलिबाग- रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील सुवर्णगणेश दरोडा आणि दोघांच्या खून खटल्याच्या आरोपातून १२ पैकी दोन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच सर्व आरोपींची मोक्कामधून मुक्तता करण्यात आली आहे. दहा आरोपींना भारतीय दंड संहितेनुसार दोषी ठरविण्यात आले असून त्यांना सोमवारी १६ रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दहा आरोपींमध्ये तीन महिला व दोन सराफांच्या समावेश आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील दिवेआगरच्या सुवर्णगणेश मंदिरावर २४ मार्च २०१२ रोजी रात्रीच्या सुमारास दरोडा टाकून दरोडेखोरांनी तेथील सव्वा किलो वजनाची सोन्याची गणेशमूर्ती चोरून नेली. दरोडा घालताना महादेव घडशी व अनंत भगत या दोन पहारेकरी ग्रामस्थांचा खून करण्यात आला होता. पोलीसांनी मोठय़ा शिताफीने पुणे, नगर व औरंगाबाद जिल्ह्यातून नवनाथ भोसले अहमदनगर, कैलास भोसले, छोटय़ा ऊर्फ सतीश काळे, आनंद रायमोकर, अजित डहाळे, विजय उर्फ विज्या काळे, ज्ञानेश्वर भोसले, गणेश भोसले, खैराबाई भोसले, विक्रम भोसले, कणी काळे, सुलभा काळे या १२ आरोपींना अटक केली.
दिघी सागरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय शुक्ला व तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल गायकवाड यांनी तपास करून सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर २०१२ मध्ये आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष मोक्का न्यायाधीश के. आर. पेटकर यांच्यासमोर २०१५ मध्ये या खटल्याची सुनावणी सुरू झाली, ती एप्रिल २०१७ मध्ये संपली. त्यानंतर अंतिम युक्तीवाद सुरू झाला.
विशेष मोक्का न्यायाधीश के. आर. पेटकर यांनी आज आरोपींचे म्हणणे ऐकून घेतले. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी केली. आरोपींच्यावतीने अॅड. मानसी म्हात्रे, अॅड. गोपीनाथ डंगर व अॅड. महेश गुंजाळ यांनी बाजू मांडली. न्यायाधीशांनी गणेश विक्रम भोसले व विक्रम हरीभाऊ भोसले यांची निर्दोष मुक्तता केली. तसेच सर्व आरोपींची मोक्कातून मुक्तता करण्यात आली.
दहा आरोपींना भारतीय दंड विधान संहितेनुसर दोषी ठरवले. त्यावर आरोपींची बाजू मांडण्यासाठी अवधी मिळावा, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. त्यानुसार आरोपींची बाजू मांडण्यासाठी १६ ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली. आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून सोमवारी १० आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पत्रकारांनी देखील गर्दी केली होती. दुपारी ३ वाजता आरोपींना न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले होते.
[EPSB]
[/EPSB]