महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाचे शहर म्हणून लौकिक असलेल्या मुंबई शहराला भकास बनवणा-या मुंबई महापालिकेतील सत्ताधा-यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन घरी पाठवा, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
मुंबई- महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाचे शहर म्हणून लौकिक असलेल्या मुंबई शहराला भकास बनवणा-या मुंबई महापालिकेतील सत्ताधा-यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन घरी पाठवा. भारत भ्रष्टाचारमुक्त करण्याआधी मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त करा, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. मुंबई महापालिका बरखास्त करून तेथील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणीही राणे यांनी केली.
विधान परिषदेत आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना नारायण राणे यांनी,‘ मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, ‘मुंबई महापालिकेत गेल्या २० वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. खरे तर मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. संपूर्ण जगातून येथे पर्यटक येत असतात. परंतु या २० वर्षाच्या कालावधीत या शहराला भकास करण्याचे काम सत्ताधा-यांनी केले आहे. जागतिक दर्जाच्या या शहराचे नेमके स्वरूप कसे झाले आहे ते पाहायचे असेल तर मुख्यमंत्री महोदय कुलाबा व वांद्रे येथील बेहरामपाडय़ात जाऊन यावे. मला खात्री आहे जर तिथे जाऊन आलात तर मुख्यमंत्री दहा दिवस जेवणार नाहीत.
येथे एकएक झोपडी पाच-पाच मजल्यांची आहे. इथे सार्वजनिक शौचालयाला दरवाजे नाहीत. दोन महिला एकत्र शौचाला जातात. एक महिला बाहेर शौचालयासमोर साडी धरून उभी राहते व दुसरी शौचालयाला जाते. इथे स्वच्छता तर नावालाही नाही. येथील लोकांना जिवंतपणीच नरकयातना सोसाव्या लागत आहेत.
या मुंबई शहरात ज्यांची सत्ता आहे, त्या पक्षप्रमुखांचे निवासस्थान बेहरामपाडय़ापासून दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. तिथून विमानतळ व मंत्रालयही केवळ पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. इतक्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विभागाची ही अवस्था आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३४ हजार कोटींचा असताना या शहराचा विकास होऊ शकत नसेल तर याचा शोध कोण घेणार, असा सवाल राणे यांनी केला.
टक्केवारी घेणा-यांविरोधात कारवाई का नाही?
मुंबई महापालिकेची अशी अवस्था कशामुळे झाली असेल तर ती केवळ भ्रष्टाचारामुळेच झाली आहे. इथे जितका भ्रष्टाचार आहे, तो जगात कुठेही नसेल, असे सांगून राणे म्हणाले की, ज्यांची मुंबई महापालिकेत सत्ता आहे त्या पक्षाचे नेते परदेशात फिरायला जातात ना? शांघाय, सिंगापूर, क्वालालंपूर, न्यूयॉर्क येथील रस्ते त्यांनी पाहिले असतील. तसे रस्ते इथेही असावेत, असे त्यांना का वाटत नाही. मुंबई महापालिकेतील कंत्राटामधील कोटय़वधी रुपये हे केवळ टक्केवारी वाटण्यात जात असल्याने ठेकेदाराला चांगल्या दर्जाचे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुंबई महापालिकेच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाची चौकशी होऊन त्यात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.
अधिका-यांवर कारवाई झाली. पण कंपन्यांवर कारवाई का झाली नाही? ज्यांनी टक्केवारी घेतली त्यांच्याविरोधात कारवाई का झाली नाही? खरा भ्रष्टाचार या कंत्राटदारांकडूनच होत आहे. कुणालाही कसेही कंत्राट दिले जाते. वेगवेगळय़ा कामांसाठी सल्लागार नेमले जातात. या सल्लागाराला पैसे दिले त्यांनी ते काम वेळेत केले का, हे पहाण्याची जबाबदारी कुणाची आहे, असा सवाल करून राणे म्हणाले की, ‘देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडसाठी एक सल्लागार नेमले होते. पाच हजार कोटींचा करार झाला. त्यासाठी पाचशे कोटी रुपये अनामत रक्कम देण्यात आली. मात्र या सल्लागाराने कोणतेही काम केले नाही. अखेर हे पाचशे कोटी रुपये बिनव्याजी परत घेतले. महापालिकेत २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. काही झाडाचे नुसतेच वय वाढते मात्र त्याच्याकडून ना सावली मिळते ना फळ मिळते. तशीच अवस्था शिवसेनेची झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्यापासून शिवसेनेच्या झाडाला फळेच लागली नाहीत, असा टोलाही राणे यांनी लगावला.
मराठी माणूस मुंबईतून का हद्दपार झाला?
मुंबई शहरात सुरू असलेल्या एसआरएच्या योजना व त्यामाध्यमातून सुरू असलेल्या भ्रष्टाचारावरही नारायण राणे यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, गरीब झोपडीधारकाला चांगल्या घरात राहायला मिळावे यासाठी एसआरए सुरू झाले. मात्र आज तिथे प्रचंड भ्रष्टाचार माजला आहे. एखाद्या प्रकल्पाबाबत एखादी बातमी वर्तमानपत्रात छापून आणायची. ती बातमी छापून आली की लगेच त्याच्या विकासकाला बोलावून घ्यायचे. तुझ्याविरोधात बातमी आली आहे. तुला काढून टाकण्यात येत आहे. दुसरा विकासक नेमला जाईल, अशा त-हेने धमकावले जात आहे. ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत त्यांना नोटिसा पाठवल्या जातात आणि चांगल्या इमारतीला नोटीस पाठवून जबरदस्तीने इमारत पाडली जातात. त्याचे बोलके उदाहरण परळ येथील बोगदा चाळ आहे. या चाळीची इमारत चांगली असताना तेथील रहिवाशांना जबरदस्तीने घराबाहेर काढण्यात आले. स्वत: गृह निर्माण राज्यमंत्र्यांनी अशी कारवाई केली. बोगदा चाळीतील लोक सात महिने आझाद मैदानात उपोषणाला बसले होती. याला जबाबदार कोण, असा सवालही राणे यांनी केला.
मुंबई महापालिकेकडून इमारत बांधकामासाठी परवानगी देताना कशाप्रकारे भ्रष्टाचार होतो हे सांगताना राणे म्हणाले की, शिवसेनेने नेहमी मराठी माणसाच्या नावाने राजकारण केले. आज मुंबईत मराठी माणूस राहिला आहे का? बहुतेक मराठी माणूस वसई, विरार, अंबरनाथ, बदलापूरच्या पुढे निघून गेला. मराठी माणूस मुंबईतून का हद्दपार झाला, यालासुद्धा शिवसेनाच जबाबदार आहे. आज मुंबईत घराची किंमत १० आणि १५ कोटींच्या पुढे गेली आहे. अगदी वांद्रे, अंधेरी परिसरात घर घ्यायचे झाले तरी ३ ते ५ कोटी रुपये मोजावे लागतात. ही घरे मराठी माणूस घेऊ शकणार आहे का? का वाढल्या घरांच्या किंमती? याचे उत्तर आपल्याला मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारातच मिळेल. नवीन इमारत बांधण्यासाठी परवानग्या देताना स्वेअर फूटावर पैसे घेतले जातात. मग घराच्या किंमती कशा कमी होणार? असा सवाल राणे यांनी केला.
खरेदी-विक्रीतून पैसे कमावणे एवढाच उद्देश
उद्योग विभागाच्या माध्यमातून सुरू असणा-या भ्रष्टाचारावरही राणे यांनी आसूड ओढले. ते म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून ८.७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात किती गुंतवणूक झाली ते सांगा. केवळ अंधेरी येथील एमआयडीसीचे कार्यालय विकून बीकेसीत कार्यालय घेतल्याने कसे उद्योग वाढणार आहेत. या बदलाबदलीत केवळ खरेदी व विक्रीतून पैसे कमावणे एवढाच उद्देश असल्याचा टोलाही राणे यांनी लगावला. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवायचे असेल व इथले पर्यटन वाढवायचे असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार करून मुंबईला भकास बनवले, त्यांना घरी पाठवा. मुंबई महापालिका बरखास्त करा व झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी जोरदार मागणी राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.