आघाडीच्या फळीतील दिलशान मुनवीराच्या (२९ चेंडूंत ५३ धावा) झटपट अर्धशतकाच्या जोरावर एकमेव टी-२० लढतीत बुधवारी श्रीलंकेने भारतासमोर १७१ धावांचे आव्हान ठेवले.
कोलंबो- आघाडीच्या फळीतील दिलशान मुनवीराच्या (२९ चेंडूंत ५३ धावा) झटपट अर्धशतकाच्या जोरावर एकमेव टी-२० लढतीत बुधवारी श्रीलंकेने भारतासमोर १७१ धावांचे आव्हान ठेवले. मधल्या फळीतील अशन प्रियंजनची (४० चेंडूंत नाबाद ४१ धावा) त्याला चांगली साथ लाभली.
पावसाने व्यत्यय आणलेल्या लढतीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने वैयक्तिक दुस-या आणि सामन्यातील तिस-या षटकात कर्णधार उपुल थरंगाच्या (५) यष्टय़ा उडवत यजमानांना पहिला धक्का दिला. दुसरा सलामीवीर निरोशन डिकवेलाने सावध पवित्रा घेतला तरी मुनवीराने मनमोकळी फटकेबाजी केली. त्याच्यामुळे श्रीलंकेला प्रति षटकामागे १० धावा करता आल्या. मुनवीराने अवघ्या २६ चेंडूंत अर्धशतकी मजल मारली. त्याने २९ चेंडूंत ५३ धावा फटकावल्या.
त्यात पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. मुनवीराने लेगस्पिनर युझवेंद्र चहलला प्रमुख लक्ष्य करताना चार षटकार ठोकले. मधल्या फळीतील अनुभवी अँजेलो मॅथ्यूज (७) लवकर परतला तरी अशन प्रियंजनने ४० चेंडूंत १ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४० धावांचे योगदान दिले. इसुरू उडाना (१० चेंडूंत नाबाद १९), थिसरा परेरा (७ चेंडूंत ११ धावा) आणि सीकुजे प्रसन्नामुळे (८ चेंडूंत ११ धावा) श्रीलंकेला निर्धारित २० षटकांत ७ बाद १७० धावा करता आल्या. भारतातर्फे लेगस्पिनर युझवेंद्र चहलने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तरी ४ षटकांत ४३ धावा मोजल्या. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार (३६-१) आणि जसप्रीत बुमरासह (३८-१) डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल (२९-०) महागडा ठरला तरी ‘चायनामन’ स्पिनर कुलदीप यादवने (४-०-२०-२) अचूक मारा केला.
[EPSB]
[/EPSB]