सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक झालो आहे, असे मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
क-हाड- दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना सत्यात उतरविता आलेले नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक झालो आहे, असे मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला फडणवीस यांनी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले. तसेच महाराष्ट्रात राहणा-या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तनाचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आमचे सरकार काम करीत आहे. मला विश्वास आहे, ज्या सुसंस्कृत राजकारणाचा पुरस्कार यशवंतरावांनी केला होता ते सुसंस्कृत राजकारण करीत सामान्यांना, शेतक-यांना तसेच वंचितांना न्याय देण्याचे काम आम्ही करू. तिच प्रेरणा मी या ठिकाणाहून घेऊन जातो, असेही ते म्हणाले.
आघाडीच्या नेत्यांना पापाचे मोल चुकवावे लागेल
हुतात्मा कारखान्याला यापूर्वी इथेनॉल प्रकल्प मंजूर केला; मंजूर झालेला प्रकल्प पुन्हा रद्द करण्याचे पाप मागील आघाडी सरकारच्या काळात झाले. परंतु या पापाचे मोल संबंधीतांना चुकवावेच लागेल, असा सूचक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाळवा येथील कार्यक्रमात विरोधकांना दिला.
नाभिक समाजाची माफी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पुन्हा एकदा माफी मागितली आहे. कोल्हापूरमधील वारणा येथे ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात फडणवीस यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.