शिवसेनेने मुंबईचा ‘पाटणा’ केला आहे, अशा खोचक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई- पारदर्शकता आणि स्वच्छ कारभाराच्या केंद्राच्या अहवालात मुंबई महापालिकेला बिहार महानगरपालिकेप्रमाणे समान गुण मिळाले आहेत, त्यामुळे शिवसेनेने मुंबईचा ‘पाटणा’ केला आहे, अशा खोचक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या कित्येक वर्षात मुंबई महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणाला मान्यताच मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या भाजपाच्या प्रचाराचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुलुंड येथे सभा घेऊन केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला. मुंबई महापालिकेला केंद्राच्या अहवालात पहिला नंबर मिळाल्याचे उद्धव ठाकरे सांगत आहेत, ते चुकीचे असून हैदराबाद महापालिकेला पहिला क्रमांक मिळालेला आहे.
मुंबईला तिसरा क्रमांक मिळाला आहे, तोही राज्य सरकारच्या अखत्यारित, जी कामे झाली आहेत त्यामुळे मुंबईची इज्जत वाचली. उद्धव ठाकरे यांना सल्लागारांनी चुकीची माहिती दिली. अर्धवट किंवा चुकीचे सल्लागार ठेवले की, अशी फजिती होते. ३५ हजार कोटींचा अर्थ संकल्प असणा-या मुंबई महापालिकेची अवस्था बकाल कशामुळे झाली, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.