राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस बुधवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतक-यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.
मुंबई- राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस बुधवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतक-यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी काही शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्रही देण्यात आले. या शेतक-यांनी कर्जमाफीचा लाभ मिळाल्यावर मनोगत मांडले. निसर्गाची अवकृपा झाल्याने उत्पन्न घटले, त्यामुळे कर्ज परत करता आले नाही, शेतीमधील भांडवल गुंतवणुकीचे मार्ग बंद झाले, पण आता कर्जमाफी झाली आहे. यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील, असा विश्वास पालघरमधील शेतकरी चंद्रकांत दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केला.
कर्जमाफीच्या प्रमाणपत्रानंतर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील २० लाख हेक्टर जागा सिंचनाखाली आणली, असा दावा त्यांनी केला. शेतीचा विकास दर उणे होता, मात्र आता तो १२ ते १२.५ टक्क्यांवर पोहोचला, उत्पन्नही ४० हजार कोटी रुपयांनी वाढले असा दावा त्यांनी केला. यापूर्वीही शेतक-यांसाठी कर्जमाफी झाली, मात्र शेतीमध्ये गुंतवणूक न केल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला. मात्र आम्ही कर्जमाफी करतानाच शेतीमध्ये गुंतवणूक करत आहोत.
शेतक-यांना सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. कर्जबाजारी शेतक-यांना शेतीसाठी पुन्हा कर्ज मिळत नाही, मग तो सावकाराच्या दुष्टचक्रात अडकतो. म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्जाची घोषणा केली, त्यावेळी आमच्यावर टीका झाली. पण जनतेचा पैसा वाचला पाहिजे, बँकांच्या चुकीच्या खात्यात पैसे जाऊ नये यासाठीच ऑनलाइन अर्जाचा निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले. मुंबईत शेतकरी असू शकतात, पण त्यांचे प्रमाण कमी असेल. मात्र यादीत मुंबईतही ८१३ शेतकरी असल्याचे समोर आले. याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या शेतक-यांनी नियमित कर्जफेड केली त्यांनाही प्रोत्साहन देण्याची गरज होती, त्यांना २५ हजारांची प्रोत्साहन रक्कम देणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. निकषांमध्ये बसणारा शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी अनुसूचित जाती व जमातीच्या निधीचा वापर केल्याचे वृत्त होते. मात्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा फेटाळला. सामाजिक न्याय विभागाचा एकही पैसा कर्जमाफीसाठी घेतला नाही, असे त्यांनी सांगितले.
[EPSB]
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाद्वारे सिंधुदुर्गवासीयांनी मला दिलेली आजवरची ही अभूतपूर्व अशी दिवाळी भेट आहे, अशा शब्दांत मतदारांविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाच माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी, शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पालकमंत्री या निवडणुकीत निष्प्रभ ठरले आहेत.
[/EPSB]