दहीहंडीच्या उंचीबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानेच सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
नवी दिल्ली- दहीहंडीच्या उंचीबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानेच सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे येत्या सात ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे.
दहीहंडीच्या २० फूट उंचीसह गोविंदाचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, राज्य सरकारने हे नियम शिथिल करण्यासाठी व नियमांत बदल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सुरक्षेच्या उपाययोजनांची राज्य सरकारकडे विचारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. जर उच्च न्यायालयाला योग्य वाटले तर ते निर्बंध हटवायचे की ठेवायचे यावर निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले आहे.