डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांचीही तशाच पद्धतीने हत्या होत असेल तर खरोखर देश सुरक्षित आहे का? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला विचारला आहे.
मुंबई- डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांचीही तशाच पद्धतीने हत्या होत असेल तर खरोखर देश सुरक्षित आहे का? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला विचारला आहे. दरम्यान, या विचारवंतांच्या मारेक-यांना संघटितरीत्या मदत मिळत असल्याचा निष्कर्षही हायकोर्टाने काढला आहे.
अशा वातावरणात आम्ही आमच्या घरात तरी सुरक्षित आहोत का? या शब्दांत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारींनी तपास यंत्रणांना सुनावले. गौरी लंकेशच्या रूपात आणखी एका विचारवंताची हत्या होणे, हे समाजाचे दुर्भाग्य असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणी झाली. यावेळी सीबीआय आणि एसआयटीने आपापला तपास अहवाल हायकोर्टात सादर केला.
मात्र, सध्या तरी यंत्रणेला फारसे मोठे यश न मिळाल्याचे त्यांनी यावेळी कबूल केले. यावर तपास यंत्रणांनी श्रेयवादाच्या चढाओढीत न अडकता संपूर्ण देश पिंजून काढायला हवा, असा सल्ला हायकोर्टाने दिला. सध्या तरी मारेकरी हे तपास यंत्रणेपेक्षा हुशार असल्याचे सिद्ध होत आहे. याचाच अर्थ मारेक-यांना संघटितरित्या हरप्रकारे मदत पुरवली जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे हायकोर्ट म्हटले आहे. या प्रकरणाची पुढची सुनवणी १४ डिसेंबरला होणार आहे.