जात्यंध शक्तींवर आपल्या धारदार लेखणीने प्रहार करणा-या आणि पुरोगामित्वाच्या मापदंड ठरलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर संपूर्ण समाजमन ढवळून निघाले आहे.
जात्यंध शक्तींवर आपल्या धारदार लेखणीने प्रहार करणा-या आणि पुरोगामित्वाच्या मापदंड ठरलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर संपूर्ण समाजमन ढवळून निघाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली होती, त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आल्याने, या सर्व हत्या एकाच विचारसरणीतून झाल्या असाव्यात असा निष्कर्ष काढायला वाव आहे. विचारवंत, विवेकवादी, समाजसुधारकांच्या दिवसाढवळ्या खून पाडणा-या हिंस्त्र प्रवृत्ती अद्याप मोकाट आहेत, ही बाब पुरोगामित्वाचा आव आणणा-या नेत्यांसाठी आणि देशासाठी लाजीरवाणी आहे.
आपल्या धारदार लेखणीला शस्त्र बनवून उजव्या विचारसरणीवर तुटून पडणा-या कट्टर विज्ञानवादी पत्रकार गौरी लंकेश यांची याच आठवडय़ात मंगळवारी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावर बंगळुरूमधील राजराजेश्वरी भागात जवळून गोळ्या झाडल्या. गोळ्या वर्मी लागल्याने त्या जागीच कोसळल्या व त्यांचा मृत्यू झाला. गौरी राजराजेश्वरी नगरातील आयडियल होम्स टाऊनशीपमधील डय़ुप्लेक्स हाऊसमध्ये राहत होत्या. हत्या झाली त्यावेळी या गल्लीतील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सीसीटीव्हीमध्ये आरोपींचे फोटो व्यवस्थित आले नसल्याचे तपासयंत्रणांचे म्हणणे आहे. गौरी यांच्यावर हल्ला करणारे कोण होते आणि कोणत्या कारणासाठी त्यांची हत्या करण्यात आली याबाबत अद्याप कोणतीच माहिती पुढे येऊ शकलेली नाही, हे आपल्या तपास यंत्रणांच्या अपयशाचे मोठे कोडे आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आधी आठ दिवसांपूर्वी काही तरुण त्यांच्या घराबाहेर संशयास्पदरित्या फिरत होते. त्यामुळे काहीतरी गडबड होणार असल्याचे त्यांना जाणवले होते. हा प्रकार त्यांनी आई आणि बहिणीच्या कानावरही घातला होता. पण पोलिसांत तक्रार केली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. गौरी यांना जीवे मारण्याची धमकी आली नव्हती. त्या नेहमी बडय़ा पोलीस अधिका-यानाही भेटायच्या. पण त्यांनी पोलिसांकडेही जीवाला धोका असल्याचे कधी सांगितले नव्हते. आठवडाभरापूर्वी गौरी बंगळुरू येथीलच बानाशंकरी येथील तिच्या बहिणीच्या घरी आजारी आईला पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. काही संशयित लोक त्यांच्या घराच्या आसपास फिरत असल्याचे आपल्या बहिणीला सांगितले होते. त्यावेळी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला बहिणीने दिला होता, असे सांगितले जाते. गौरी यांची हत्या कोणत्या कारणामुळे झाली याबाबात अद्याप कोणतीही बाब स्पष्ट झालेली नाही. मात्र वैचारिक मतभेदामुळे त्या काहींच्या निशाण्यावर होत्या, हे मात्र नक्की.
हत्येपूर्वी काही तासच आधी गौरी लंकेश यांनी धर्मनिरपेक्षतेवर भाष्य करणारी एक पोस्ट फेसबुक पेजवर लिहिली होती. हेच भाष्य गौरी यांचे अखेरचे ठरले. ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी दुपारी तीनच्या दरम्यान गौरी यांनी फेसबुकवर केरळचा सण ओणम सर्वधर्मीय कसा साजरा करतात व धर्मनिरपेक्षता हीच केरळची कशी ओळख आहे, हे पोस्टमध्ये लिहिले होते. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पोस्ट केलेला व्हीडिओ शेअर करीत गौरी यांनी हे भाष्य केले होते. काही ख्रिश्चनन एकत्र येत ओणमनिमित्त नृत्य करीत असल्याचा व्हीडिओ थरूर यांनी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला होता. थरूर यांची हीच पोस्ट शेअर करीत गौरी यांनी धर्मनिरपेक्षतेचा पुकारा केला होता. ‘केरळचे नागरिक ओणम साजरा करीत आहेत. धार्मिक भेदभाव गळून पडले आहेत. यालाच केरळी नागरिक आपला देश म्हणतात..’, असे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले होते. ‘माझ्या मल्लू मित्रांनो, कृपया धर्मनिरपेक्षतेची हीच भावना कायम ठेवा.. पुढच्या वेळी मी जेव्हा केरळमध्ये येईन, तेव्हा मला आशा आहे की, कुणीतरी एखादी चवदार बीफ डिश करून देईल’, अशी अपेक्षाही त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली होती. हीच पोस्ट गौरी यांची अखेरची ठरली.
गौरी लंकेश यांचा जन्म २९ जानेवारी १९६२ रोजी कर्नाटकमधील लिंगायत कुटूंबात झाला. त्या क्रांतिकारी विचारांच्या पत्रकार होत्या. बेंगळुरूमधून प्रकाशित होणा-या लंकेश पत्रिकेच्या त्या संपादक होत्या. त्यांचे पिता पी. लंकेश कन्नड भाषेतील प्रसिद्ध लेखक, कवी व पत्रकार होते. त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले होते. १९८० मध्ये त्यांनी लंकेश नामक कन्नड साप्ताहिक सुरू केले. गौरी, कविता आणि इंद्रजित अशी तीन अपत्ये त्यांना होती. गौरी यांनी टाईम्समधून आपल्या पत्रकारितेला सुरुवात करून पत्रकार म्हणून मोठे नाव कमावले होते. त्यांचे इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषांवर प्रभुत्त्व होते. नऊ वर्षे त्यांनी संडे मॅग्झिनमध्ये काम केले होते. त्यांचे पिता लंकेश यांचे २००० मध्ये निधन झाले त्यावेळी गौरी इनाडू वाहिनीच्या तेलुगू शाखेत कार्यरत होत्या. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी भावासह लंकेश पत्रिका जोमाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांचे नक्षलवाद्यांच्या वृत्तांकनावरून मतभेद झाले. त्यांच्यावर नक्षल्यांचे समर्थन करण्याचा आरोप झाला. शेवटी हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आणि वैयक्तिक आरोप- प्रत्यारोप झाले. त्या डाव्या विचारांच्या समर्थक होत्या आणि उजव्या विचारसरणीला त्यांचा कट्टर विरोध होता. शिवाय सत्ताविरोधी भूमिका घेऊ न जनतेच्या हिताची पत्रकारिता करीत होत्या. त्या निर्भिड होत्या. सरकारच्या अत्याचारामुळे त्रस्त लोकांच्या त्या आवाज होत्या. त्यांनी नक्षल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. यामुळे त्यांना पत्र आणि ई-मेलच्या माध्यमातून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. गेल्या काही वर्षात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी अशा पुरोगामी कार्यकर्त्यांची हत्या झाल्याने बुद्धिजीवीवर्गामधील चिंतेचे वातावरण आता आणखी गडद झाले आहे.
दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे विरोधी भूमिका घेणा-याच्या रांगेतील हा चौथा बळी असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे. देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक म्हणून गौरी लंकेश यांना ओळखले जात होते. हिंदुत्वावादाचा विरोध केल्याचा समज करीत यापूर्वी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. त्याचा तपास राज्य सरकारांच्या गुन्हे शाखेने केला. पण त्याला गती नव्हती. त्यामुळे या प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात आला. त्यानंतरही दिवसाढवळ्या विचारवंतांचा खून करण्याचा सुगावा लागला नाही. यातच लंकेश यांच्या हत्येने पुन्हा या घटनांना उजाळा मिळाला आहे.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व आता गौरी यांनी चर्चेचे आव्हान कधीच नाकारले नव्हते. दुर्दैव हे की त्यांच्या विचारांना विरोध करणा-यानी एकाच व्यासपीठावर येण्याची तयारी दर्शविली नाही. देशात भिन्न मतप्रवाह असू शकतात. किंबहुना ते असायलाच हवेत. मात्र या सर्व मतप्रवाहातून झालेले विचार मंथन हे समाजाच्या हिताचेच असेल यावर भर द्यायला हवा. आज मात्र सर्वच चित्र धूसर आहे. तुम्ही खरे बोलाल तर परिणामांना सामोरे जा असे सुचविणारी विघातक शक्ती उग्र रूप धारण करत आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. विशिष्ट भूमिका घेऊन काम करणा-या कार्यकर्त्यांना का संपवले जात आहे, याचा छडा लावण्यात तपास यंत्रणांना येणारे सपशेल अपयशही चिंताजनक आहे. तपास यंत्रणांच्या नाकर्तेपणामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू लागले आहे. वैचारिक, राजकीय, आर्थिक, वैयक्तिक यापैकी नेमक्या कोणत्या कारणाने हत्या झाली, या सत्याची उकल वेळेवर होणे आवश्यक आहे. विरोधी मतांचा आणि न पटणा-या भूमिकांचा आदर करण्याइतपत सुसंस्कृतपणा दाखवायला हवा. तो नसेल तर समाज स्वास्थ्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. वैचारिक वाद घालण्याची क्षमता नसेल तर न पटणा-या विचाराला, अमान्य भूमिकेकडे दुर्लक्ष करून अनुल्लेखाने मारता येते. पण त्याऐवजी माणूस मारण्याचाच रानटीपणा होणार असेल, तर ही प्रवृत्ती सुसंस्कृत समाजासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळेच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांच्या हत्येचा धिक्कार करावा तितका थोडा आहे.
दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यांच्या काळात या हत्येचा शोध त्यांना लावता आला नाही. पानसरे यांची हत्या झाली, तेव्हा राज्यात सत्तांतर होऊन भाजप युतीचे सरकार होते. या सरकारने पानसरे हत्या प्रकरणी एकाला अटक केली. पण दाभोलकर हत्येचे गूढ कायम आहे. दुसरीकडे कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्त्या कर्नाटकात झाल्या. या राज्यात काँग्रेसचेच सरकार आहे. कलबुर्गी यांच्या हत्येला वर्षे झाली तरी अद्याप मारेक-याचा शोध लागलेला नाही, त्यातच आता गौरी लंकेश यांची हत्या झाली आहे. अर्थात राज्य स्तरावर कोणतेही सरकार असले, तरी राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार असल्याने, त्यांनाही जबाबदारी टाळता येणार नाही. मोदी यांचे सरकार आल्यानंतर देशातील डाव्या विचारसरणीचे साहित्यिक, पत्रकार आणि विचारवंत याच्यांवर हल्ले वाढले आहेत, ही भावना वाढत चालली आहे, हे नाकारता येणार नाही. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असले तरी गौरी आपल्या लिखाणातून नेहमी भाजपला लक्ष्य करत होत्या. गौरी लंकेश यांनी भाजपच्या काही नेत्यांविरुद्ध लिखाण केल्याबद्दल खासदार प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये लंकेश यांना दोषी ठरविण्यात आले होते आणि सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या जामिनावर मुक्त झाल्या असतानाच त्यांची हत्या करण्यात आली, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर या मुद्यावरून सुरू असलेले राजकारणही निषेधार्ह आहे. या प्रकरणावर भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे. गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे वक्तव्य भाजप आमदार आणि माजी मंत्री डी. एन. जीवराज यांनी केले आहे. कर्नाटकचे पोलीस असोत किंवा सीबीआय; त्यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावून गौरी यांच्या हत्येचा तपास केला तरच या खुनाची उकल होईल. मुख्य म्हणजे संभ्रमाचे वातावरणही संपून जाईल आणि कदाचित संभाव्य घटनाही थांबू शकतील. विचारवंतांची अशा प्रकारे हत्या होत राहणे देशाला परवडणारे नाही.
ज्या चार विचारवंतांची हत्या झाली ते सारे समाजाबद्दल कळवळा असणारे आणि नेहमी समाजहिताची भावना बाळगणारे होते. लोकशाही मूल्यांचे जतन करणारे होते. गौरी प्रतिगामी शक्तींच्या निशाण्यावर होत्या तसेच नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्नामुळे सशस्त्र आंदोलनात सक्रिय असणा-या नक्षलींचाही त्यांच्यावर रोष होता हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे गौरी यांची हत्या कोणी व कशासाठी केली याचा उलगडा तपासाअंतीच होणार आहे. वैचारिक मतभेद असले तर ते चर्चेने दूर करता येतात. मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट भिन्न विचार मांडणा-या विचारवंतांची हत्या करून क्रौर्याची परिसीमा गाठण्याचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार समाजाची चिंता वाढवणारे आहेत. समाजहितासाठी वेगळ्या विचारांची मांडणी करणा-या साहित्यिक, संशोधक व विचारवंतांबरोबरच पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकशाहीच्या चौकटीत राहून गौरी लंकेश आपले वेगळे विचार मांडत असतील आणि त्या विचारांची हत्या होणे ही लोकशाहीच्या गाभ्याची हत्या आहे. आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर मारेकरी पकडले जाणे आणि त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. सर्वात अस्वस्थ करणारी उदासीनता आपल्या देशातील संघटित दहशतवादाच्या विरोधात काम करण्यासाठी स्थापन झालेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेची आहे. धर्माच्या नावावर दहशत पसरवू इच्छिणा-या शक्तींना अगदी नाइलाज झाल्याशिवाय तपासायचे नाही, हे धोरण या संथ गती तपासाच्या मुळाशी असल्याचे दिसते. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या सा-याच्या हत्या या काही वैयक्तिक अथवा कौटुंबिक कारणांतून झालेल्या नाहीत, हे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. पटत नसलेले विचार द्वेषबुद्धीने आणि नियोजनबद्धपणे संपविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे जोपर्यंत हे मारेकरी फरारी आहेत, तोपर्यंत विवेकी विचार मांडणा-या लोकांना कायम धोका राहणार आहे.