भ्रष्टाचार प्रकरणी आरोप असलेल्या मुंबई महापालिकेतील १२ नगरसेवकांची २०१२पासून चौकशीच झालेली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई- भ्रष्टाचार प्रकरणी आरोप असलेल्या मुंबई महापालिकेतील १२ नगरसेवकांची २०१२पासून चौकशीच झालेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीतून ही माहिती पुढे आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या नगरसेवकांची चौकशी करण्यात येणार होती. या नगरसेवकांवर २०१२मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी आरोप करण्यात आलेले होते; मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या नगरसेवकांची अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही.
यातील दोन प्रकरणांत दोन नगरसेवकांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. तर चार प्रकरणांत चौकशी प्रलंबित ठेवण्यात आलेली आहे. एका प्रकरणात एका नगरसेवकाला चौकशीअंती सोडण्यात आलेले आहे. तर अन्य चार प्रकरणांत चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात देण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणांबाबत अत्यंत त्रोटक माहिती आहे. त्यामुळेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या नगरसेवकांची चौकशी करण्यास गंभीर नसल्याची खंत घाडगे यांनी व्यक्त केली आहे; मात्र राजकीय पक्षांनी अशा नगरसेवकांना तिकीट देण्याआधी विचार करायला हवा. अशा नगरसेवकांना तिकीट दिले गेल्यास राजकीय पक्षांच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो. या उलट अशा व्यक्तींना महत्त्व देऊन राजकीय पक्षांनी त्यांना तिकीट दिल्यास हा नागरिकांचा विश्वासघातही ठरू शकेल, असे मत घाडगे यांनी व्यक्त केले आहे.
यातील काही नगरसेवकांची अद्याप चौकशी सुरू असताना; केवळ आरक्षित जागांमुळे त्यांच्या पत्नींना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. यात मोहसिन हैदर आणि ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याशी संपर्क साधला असता; आपल्याला याबाबत काहीही कल्पना नसल्याची माहिती त्यांनी दिली.