रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या आणि जागतिक ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) लोकल प्रवाशांमधे कधी नव्हे ती मोठी घट होते आहे.
मुंबई- रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या आणि जागतिक ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) लोकल प्रवाशांमधे कधी नव्हे ती मोठी घट होते आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल ७२ लाखांहून अधिक प्रवासी कमी झाले असून हा मध्य रेल्वेला मोठा धक्का आहे. प्रवासी कमी होण्याबरोबरच उत्पन्नातही घट झाल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याच वेळी सीएसएमटीतील प्रवासी घटले असले तरी उपनगरांतील स्थानकांच्या प्रवाशांत मोठी वाढ झाल्याचेही रेल्वे अधिका-यां नी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत नवी मुंबईचा मोठय़ा प्रमाणात विकास झाल्याने अनेक सरकारी आणि खासगी कार्यालये या ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत.
नवी मुंबईपाठोपाठ वांद्रे-कुर्ला संकुलातही अनेक कार्यालये उभी राहिली. तसेच अंधेरीतही छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांचा पसारा हळूहळू वाढत गेला. त्यामुळे मुंबई शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली. त्याचाच परिणाम म्हणजे दादरनंतरच्या लोकल गाडय़ांवर होऊ लागला आहे. येथील प्रवाशांची गर्दीही ओसरू लागली आहे. मात्र ती एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असेल याचा अंदाज मध्य रेल्वेला नव्हता. ज्यामुळे थेट जागतिक वारसा असलेल्या सीएसएमटी स्थानकावरच त्याचा परिणाम झाला आहे. या स्थानकात लोकलसाठी ७ प्लॅटफॉर्म आहेत. यात मुख्य मार्ग आणि हार्बर मार्ग असून त्यापुढे ११ प्लॅटफॉर्म हे लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी आहे.
कुलाबा आणि नरिमन पॉइंट परिसरात मंत्रालय, बीएमसी, पोलीस कार्यालय, न्यायालय यासह काही खासगी कार्यालय तसेच पर्यटनस्थळ असल्याने सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या आणि येथून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या तशी लक्षणीयच. मात्र गेल्या तीन वर्षांत या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. २०१४-१५ मध्ये सीएसएमटीत येणाऱ्या आणि सीएसएमटीतून जाणाऱ्या ५ कोटी ८८ लाख २४ हजार ८७५ लोकल प्रवाशांची नोंद आहे. तर हीच संख्या २०१६-१७ या वर्षांत घटून ५ कोटी १६ लाख ७ हजार ७८० एवढी झाल्याचे सांगण्यात आले. हे पाहता तब्बल ७२ लाख १७ हजार ९५ प्रवासी घटले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रवासी घटल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावरही झाला आहे. उत्पन्न हे ३ कोटी ७६ हजार ६८३ रुपयांनी कमी झाल्याचे सांगण्यात आले.
[EPSB]
[/EPSB]