उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेससोबत युतीची घोषणा समाजवादी पक्षाकडून लवकरच करण्यात येईल, असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस, सपा हातमिळवणीमुळे भाजपाच्या तंबूत मात्र अस्वस्थता पसरली असून अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी,‘उत्तर प्रदेशात पुढील सरकार समाजवादी पक्ष व काँग्रेसचे असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची मुख्य जबाबदारी शिरावर असलेल्या आझाद यांनी आघाडीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आघाडीसाठी नुकतीच प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक रणनीती येत्या दोन तीन दिवसांत ठरवण्यात येईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाच्या नावासह ‘सायकल’ ही अखिलेश यादव यांच्या गटाला दिल्यानंतर काँग्रेस आणि सपा आघाडीचा निर्णय झाला आहे. संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोक दल, काँग्रेस, सपा अशी ‘महाआघाडी’ या निवडणुकीत नक्कीच चमत्कार घडवेल, असा विश्वास सपा नेते व अखिलेश यादव यांचे समर्थक रामगोपाल यादव यांनी व्यक्त केला आहे.
सपा आणि काँग्रेसमध्ये काही जागांसाठी वादाचा अपवाद वगळता आघाडी निश्चित असल्याचे रामगोपाल यादव व गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश विधानसभेसाठी ४०३ मतदारसंघ असून अखिलेश यादव यांचा मुख्य सत्ताधारी पक्ष असल्याने त्यांच्या वाटय़ाला जास्त जागा जाणार आहेत. त्याखालोखाल काँग्रेस, संयुक्त जनता दल आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम पट्टय़ातील अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोक दल सर्वात लहान भाऊ असेल. नवी दिल्ली येथे काँग्रेसतर्फे काही दिवसांपूर्वी आयोजित ‘जनवेदना’ रॅलीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशात ‘सप’सोबत आघाडीचे संकेत दिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला उत्तर प्रदेशात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही ‘महाआघाडी’ असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटत आहे. दरम्यान, महाआघाडी झाल्यास उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढू, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशातील काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असलेल्या शीला दीक्षित यांनी दिली आहे.
आघाडीनंतर भाजपाचा तीळपापड
काँग्रेस, समाजवादी पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेसाठी एकत्र आल्याने भाजपाचा तीळपापड झाला आहे. ही आघाडी नैसर्गिक असून उत्तर प्रदेशातील जनता या दोघांनीही नाकारेल, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे. या दोघांना यूपीए (दोन)चा प्रयोग उत्तर प्रदेशात राबवायचा आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, असा टोलाही नायडू यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशातील जनतेला समाजवादी पक्षाचे सरकार नको आहे. भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार कायदा, सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती आणि विकासकामांच्या नावाने बोंब हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे नायडू यांचे म्हणणे आहे.