भाजपने गुजरातचा सर्वागीण विकास केला असून, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी त्याबाबत प्रश्न विचारत असून, उलट काँग्रेसनेच राज्यावर अन्याय केल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.
कर्मसद- भाजपने गुजरातचा सर्वागीण विकास केला असून, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी त्याबाबत प्रश्न विचारत असून, उलट काँग्रेसनेच राज्यावर अन्याय केल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. शहा यांच्या हस्ते गुजरात गौरव यात्रेची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूळ गावापासून करण्यात आली.
गुजरात विकासाची थट्टा करणा-यांना जनताच धडा शिकवेल, असा इशारा शहा यांनी येथील जाहीर सभेत दिला. सौराष्ट्रमध्ये राहुल गांधी यांचा दौरा झाला होता. त्या वेळी त्यांनी भाजपवर राज्याला विकासाच्या बाबतीत मागे ठेवल्याचा आरोप केला होता. काँग्रेसच्या पहिल्या पिढीने सरदार पटेल यांना भारतरत्न न देता त्यांचा अपमान केला, तर इंदिरा गांधी यांनी मोरारजी देसाईंवर अन्याय केला. आता काँग्रेसची तिसरी पिढी सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी मोदींवर अन्याय केला, असा आरोप शहा यांनी केला.
गुजरातची जनता याचा काँग्रेसला जाब विचारेल, असे शहा यांनी सांगितले. १९९५ मध्ये गुजरातमध्ये भाजपने काँग्रेसकडून सत्ता घेतल्यानंतर वीज उत्पादन, कृषी, शिक्षा, पायाभूत सुविधा यामध्ये लक्षणीय प्रगती केल्याचा दावा शहा यांनी केला आहे. गुजरात प्रारूप आज देशासाठी महत्त्वाचे ठरले आहे, ही गुजरातच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे शहा यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर गुजरातला एम्स तसेच बुलेट ट्रेन मिळाली, असा दावा शहा यांनी केला. गुजरात गौरव यात्रेचा दुसरा टप्पा उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जन्मस्थान पोरबंदर येथून सुरू होणार आहे. दोन मार्गावर ही यात्रा जाईल. १५ ऑक्टोबरला या यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
[EPSB]
[/EPSB]