पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदाच आपल्या गावाला भेट दिलेल्या नरेंद्र मोदींनी एका जनसभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी केंद्र सरकारच्या विकासकामांची माहिती देत काँग्रेसवर निशाणा साधला.
नवी दिल्ली- पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदाच आपल्या गावाला भेट दिलेल्या नरेंद्र मोदींनी एका जनसभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी केंद्र सरकारच्या विकासकामांची माहिती देत काँग्रेसवर निशाणा साधला. विकास वेडा झाला आहे, या काँग्रेसच्या टीकेला मोदींनी यावेळी उत्तर दिले. मोदींनी उपस्थितांना विकासाचा अर्थ विचारत रुग्णालयाची उभारणी म्हणजे विकास नाही का, असा प्रश्न विचारला. मोदींच्या या प्रश्नाला उपस्थितांनी होकारार्थी उत्तर दिले. काँग्रेसला विकासाचा तिटकारा होता, असे टीकास्त्रही मोदींनी सोडले.
‘अटलबिहारी वाजपेयींच्या काळात आरोग्य धोरण निश्चित करण्यात आले. मात्र त्यानंतर १० वर्षे सत्तेत असलेल्या सरकारला विकासाचा तिटकारा होता. आता ते सरकार गेल्यामुळे आम्हाला नवे धोरण आखता आले,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच वडनगर या आपल्या गावी आलेले नरेंद्र मोदी काहीसे भावुक झाले. ‘मी आज जो काही आहे, तो याच मातीतील संस्कारांमुळे आहे. मी याच मातीत खेळलो. तुमच्यामध्येच मी लहानाचा मोठा झालो,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना त्यांनी जनरल करिअप्पांचा अनुभवही सांगितला. ‘करिअप्पा त्यांच्या गावी गेले होते.
त्यावेळी बोलताना ‘जगात सगळीकडेच मला मोठा सन्मान मिळाला. मात्र आपल्या माणसांनी दिलेल्या सन्मान अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी म्हटले होते,’असे मोदींनी उपस्थितांना सांगितले.येथील लोकांनी माज्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. मी तुम्हाला आणि या भूमीला नमन करतो, असे मोदींनी म्हटले. हाटकेश्वर मंदिरात जाताना आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मी आज अनेक जुन्या मित्रांना भेटलो. त्यातील काहीजण आता हातात काठी घेऊन चालतात. मी माझ्या गावाच्या मातीतून नवी ऊर्जा घेऊन जात आहे. यापुढे मी देशासाठी अधिक मेहनत घेईन. देशाची मान अभिमानाने उंचावण्याची शिकवण माझ्या मातीने, येथील लोकांनी मला दिली. त्यात माझे प्रयत्न अजिबात कमी पडणार नाहीत, असेही मोदी म्हणाले.
[EPSB]
पश्चिम रेल्वे मार्गावरील एलफिन्स्टन रोड स्थानकात शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवासी मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी नायगाव स्थानकात प्रवाशांनी केलेल्या आंदोलनाच्या चेंगराचेंगरीत एक तरुणी बेशुद्ध पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
[/EPSB]