मोदी सरकारच्या ‘नोटाबंदी’ला महिना उलटूनही अराजक अद्याप संपलेले नसून आपलेच पैसे मिळत नसल्याने जनता प्रचंड त्रासली आहे.
मुंबई- मोदी सरकारच्या ‘नोटाबंदी’ला महिना उलटूनही अराजक अद्याप संपलेले नसून आपलेच पैसे मिळत नसल्याने जनता प्रचंड त्रासली आहे. नोटाबंदीनंतरची परिस्थिती हाताळण्यात सरकार सर्वच पातळयांवर अपयशी ठरले आहे.
त्यातच येत्या ३० डिसेंबर रोजी जुन्या नोटा खात्यात भरण्याची मुदत संपणार असून याच दिवशी नोटाबंदीचा निषेध म्हणून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने राज्यभरात ‘रास्ता रोको’ करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील कार्यकर्त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असून सर्वत्र नव्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. खात्यात आहेत, मात्र हातात नाही, अशा अवस्थेने जनतेचे मोठे हाल होत आहेत. दिवसभरातील किरकोळ खर्चासाठी सुद्धा लोकांकडे पैसे उरलेले नसून बँका आणि एटीएमसमोरील लांबच लांब रांगांमध्ये उभे राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
नोटाबंदीनंतर आत्तापर्यंत अनेकांचा बँकेच्या रांगेत मृत्यू झाला आहे. महिनाभरानंतरही हीच स्थिती कायम असून यामुळे जनता त्रासली आहे. देशातील सर्व बँका व टपाल कार्यालयांमध्ये १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या ५० दिवसांच्या काळात जुन्या नोटा जमा करण्याची मुदत दिली होती.
पेट्रोल पंप, रुग्णालये, सरकारी उपक्रम यांमध्ये या जुन्या नोटा देण्याची मुभा देण्यात आली होती, मात्र तीसुद्धा १५ डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे नागरिक अजूनही त्रासलेले आहेत.
सुरुवातीला नोटा बदलण्याची मर्यादा चार हजार रुपये, नंतर अडीच हजार रुपये, त्यात बँकांमध्ये नोटांचा तुटवडा, एटीएममध्येही पैसे नाहीत, यामुळे अनेक नागरिक वैतागले आहेत. महिना उलटूनही नोटाबंदीचे अराजक संपलेले नसून संसदेत आणि राज्यातील विधिमंडळात नोटाबंदीवरून विरोधी पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
मात्र जनतेसाठी विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरण्याची गरज असून येत्या ३० डिसेंबर रोजी जनतेची नाराजी सरकापर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राज्यभरात रास्ता-रोको आंदोलन व्हावे, अशी मागणी काँग्रेसच्या जिल्ह्या-जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांकडून होत आहे.