आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्या राज्याने केली नाही, तेवढी कर्जमाफी महाराष्ट्रात होणार आहे, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली येथे केला.
नवी दिल्ली- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची नवी दिल्ली येथे पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी सुनील तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.
उत्तर प्रदेशची कर्जमाफी ३६ हजार कोटींची आहे, पंजाबची आठ हजार कोटी, कर्नाटकची पाच हजार कोटी आणि आंध्रचीही पाच हजार कोटींची आहे. परंतू महाराष्ट्राची कर्जमाफी ३७ हजार कोटींची असेल, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. या कर्जमाफीमुळे अधिकाधिक शेतक-यांना कसा लाभ मिळेल, याबाबत आम्ही विरोधकांच्या भेटी घेत आहोत. यामुळे आज शरद पवार यांची भेट घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.
तसेच ३० जून २०१६ पर्यंतचा थकित शेतकरी जो आहे, तो ८३ टक्के आहे. त्याचे एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणार आहोत. त्यासाठी २५ हजार कोटी रुपये लागतील. या व्यतिरिक्त ज्यांनी नियमित कर्ज भरले, त्यांच्यासाठी आम्ही वेगळे पॅकेज तयार करत आहोत, असेही ते म्हणाले.
याबाबत आम्ही सर्वांशी चर्चा करत आहेत. त्याबाबत पवार साहेबांनी काही सूचना मांडल्या आहेत. तसेच आम्ही जी योजना तयार केली आहे त्याचे त्यांनी स्वागत केल्याचे पाटील यांनी सांगितले.
तसेच आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्या राज्याने केली नाही, तेवढी कर्जमाफी महाराष्ट्रात होणार आहे, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. ५४ एकरपर्यंतचा शेतकरी आणि एक लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी, तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-याला वेगळे पॅकेज असे सुमारे ३७ हजार कोटीपर्यंतचे पॅकेज लवकरच घोषित करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्याबाबत आज पुन्हा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांची ही तिसरी भेट आहे. याशिवाय अशोक चव्हाण यांचीही आजच भेट घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.