गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्टीकरण दिले.
मुंबई- गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्टीकरण दिले.
“प्रकाश मेहता यांनी शेरा मारलेला तो प्रकल्प आधीच रद्द झाला आहे, मग घोटाळा कसा? मात्र विरोधकांनी प्रश्न लावून धरल्याने प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करु. चौकशीत काही आढळले तर मेहतांवर कारवाई करु, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील ५०० कोटींच्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या एसआरए प्रकल्पात झालेल्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी नियम २९३ अन्वये विरोधकांनी गेल्या आठवड्यात चर्चा उपस्थित केली होती. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केला होता.
मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे या प्रकल्पाला मेहता यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचीही मान्यता होती का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात विचारला.