रहस्यमय कथेवर आधारित असलेले चित्रपट प्रेक्षकांना फार आवडतात. मात्र त्यासाठी दिग्दर्शक आणि लेखनाचीही तेवढीच कसोटी लागते. नवलखा आर्ट्स, होली बेसील कंबाईन आणि सिनेलीला टॉकीज निर्मित चित्रपट ‘चौर्य’ हा चित्रपट देखील रहस्यमय बनवण्याच्या नादात अयशस्वी ठरला.
एक असं गाव जिथे कोणत्याच घराला, खिडकीला दरवाजे नाहीत. तिथे कधीच चोरी होत नाही. झालीच चोरी तरी देव त्या चोराला योग्य ती शिक्षा देतो, अशी या गावातील लोकांची समजूत. देवमाळ देव हे तेथील जागृत देवस्थान. हजारोंच्या संख्येने भक्तांची ये-जा असते. त्या गावात एकदा जत्रा भरते.
त्या जत्रेदरम्यान लाखो भाविक आलेले असतात. पोलिसांची फौजही तैनात केलेली आहे. मात्र त्यादिवशी एक अघटित कृत्य घडतं. चक्क देवळाच्या देव्हा-यातच चोरी होते. एवढी र्वष एकदाही चोरी न झालेल्या या गावात चोरी होते. देवाच्या श्रद्धेमुळे गावकरी त्यांच्या दाराला दरवाजे लावत नसत; मात्र देवाच्याच घरात चोरी झाली म्हटल्यावर देवाच्या देवपणावरच लोकांचे प्रश्नचिन्ह निर्माण होते.
मंदिरात देणगीच्या स्वरूपात करोडो रुपये जमा होत असतात; मात्र याच पैशांची चोरी झाल्यामुळे मंदिर प्रशासन, पोलीस यांना धक्का बसतो. मग ज्यांना ज्यांना या पैशांचा छडा लागतो त्यांच्या ७५-२५ आणि ५०-५०चा खेळ सुरू होतो. दुसरीकरडे पोलीस चोरांची कसून चौकशी सुरू करतात. या सा-या प्रकारात खरा पोलीस कोण? दरोडेखोर कोण असा सारा गोंधळ चित्रपटात पाहायला मिळतो. पोलिसांच्या वेशातले चोर चोरी करतात, मग त्यात पैशांच्या हव्यासापोटी खरे पोलीसही सामील होतात.
सर्व वर्तमानपत्रांत चोरीची बातमी प्रसिद्ध होते, त्याचबरोबर दार नसलेलं गावही प्रसिद्ध होतं. गावचं हे वेगळेपण पाहायला लांबून भाविक येतात. देवळातील गुरुजी, पोलीस यांच्या मदतीने सुरू असलेल्या शोधकार्यातून काय निष्पन्न होतं? चोर सापडतात का? चोरांना काय शिक्षा होते? चोरीच्या प्रसंगानंतरही गावकऱ्यांच्या घराला दरवाजे लागतात का? या सा-या प्रश्नांची उकल चित्रपटाच्या शेवटी होते.
किशोर कदम, मिलिंद जोशी आणि प्रदीप वेलणकर असे दिग्गज आणि अनुभवी कलाकार या चित्रपटात पाहायला मिळतात. किशोर कदम हे संपूर्ण चित्रपटात निवेदकाची भूमिका मांडतात. मिलिंद जोशीनेही चांगली भूमिका केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौहेरी भूमिका मांडण्यात समीर पाटील कुठेतरी कमी पडले. लेखन उत्तम झालं असलं तरी दिग्दर्शन अजून चांगलं करता आलं असतं. कारण हीच पटकथा दिग्दर्शनाच्या मानाने अजून खुलवता आली असती. चित्रपटात तीन गाणी आहेत.
गणेश चंदनशिवे, आदर्श शिंदे आणि ऊर्मिला धनगर अशा उत्तम गायकांची साथ या चित्रपटाला लागल्याने गाणी सुरेख झाली आहेत. पार्श्वसंगीत मयूरेश केळकर यांनी केलं आहे. कला-दिग्दर्शन राज डागर यांनी केलं आहे. तांत्रिकदृष्टय़ा इतर गोष्टी चांगल्या जुळून आल्या आहेत. सुरुवात ज्या प्रसंगाने झाली त्याच प्रसंगाने शेवटही करण्यात आला. त्यामुळे सुरुवातील घडलेलं नाटय़ समजलं नसलं तरी चित्रपटाच्या शेवटी त्याची उकल होते.
एकंदरीतच चित्रपट बोर वाटत असला तरी त्याची पटकथा विचार करण्यासारखी आहे. पैशाच्या लोभापाई माणूस माणूसपण विसरत चाललाय, त्याचबरोबर त्याने देवालाही विकत घेतलंय असं यातून निष्पन्न होतं.