मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारा बहुचर्चित अशा बुलेट ट्रेनच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने आखलेल्या मुदतीतच सुरु होणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबई- मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारा बहुचर्चित अशा बुलेट ट्रेनच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने आखलेल्या मुदतीतच सुरु होणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. २०१८ सालापासून प्रकल्पाचे काम सुरु करुन ते २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद हे ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबईत आले होते. त्यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्राथमिक स्तरावरील कामांना २०१७ पासून सुरुवात केली जाईल,अशी माहिती त्यांनी दिली होती. जवळपास ९७ हजार कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पात १२ स्थानके असून चार महाराष्ट्रातील आणि आठ गुजरामधील स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे अंतर हे ५०८ किलोमीटर एवढे आहे. हा प्रकल्प झाल्यास ताशी ३२० ते ३५० किलोमीटर वेगाने ट्रेन धावेल. त्यामुळे दोन ते अडीच तासांत हे अंतर कापले जाणार आहे. सध्या याच मार्गावरुन प्रवास करण्यास सात ते आठ तास लागतात.
मुंबईत या प्रकल्पाचे पहिले स्टेशन हे मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असेल आणि ते भूमिगत असणार आहे. परंतु एमएमआरडीएच्या जागेत हे काम चालणार असल्याने त्यावरून सध्या वाद सुरु आहे.