पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांनी आज (गुरुवार) देशातील सर्वात पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं गुजरातमधील साबरमतीमध्ये भूमिपूजन केलं.
वसई- पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांनी आज (गुरुवार) देशातील सर्वात पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं गुजरातमधील साबरमतीमध्ये भूमिपूजन केलं. परंतु, या बुलेट ट्रेनला विरोध करत पालघर जिल्ह्यातील जनतेने पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांचा सोबत बुलेट ट्रेन हटावो, लोकल ट्रेन सुधारो असा नारा देत वसई पश्चिमेला आंदोलन करत या बुलेटला विरोध केला आहे.
महाराष्ट्र व गुजरातमधील नागरिकांची बुलेट ही सध्या तरी गरज नाही आहे, असे पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी सांगितले. ज्या लोकल ट्रेन आहेत त्यांच्यात वाढ करावी व त्या सुधाराव्यात, अशी मागणी देखील समीर वर्तक यांनी प्रशासनाकडे केली आहे.
त्याचप्रमाणे जपानकडून १ लाख १० हजार कोटींचे कर्ज घेऊन भारताला कर्जबाजरी का केलं जात आहे? असा प्रश्नदेखील समीर वर्तक यांनी मांडला आहे. तर सुरत – अहमदाबात येथील हिरे व्यापा-यांचा विचार करत हा सर्व घाट घातला गेला असल्याचे वर्तक यांनी म्हटले आहे.
लोकलमधून रोज प्रवास करणारे लाखो नागरिक आहेत त्यांना रोजच या गर्दीचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठीच लोकल ट्रेनवर पैसे खर्च करून त्यांना सुधारले तर सामान्य नागरिकांचे होणारे हाल कमी होतील. बुलेट ट्रेनचा उपयोग हा सामान्य जनतेला काहीच होणार नाही. मग सर्व १ लाख १० हजार कोटींचे कर्ज कशासाठी? असेही त्यांनी म्हटले आहे.