केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात लोकहिताचे असे काहीच नसून सरकारला काहीही व्हिजन नसल्याची टीका काँग्रेसने बुधवारी लोकसभेत केली.
नवी दिल्ली- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात लोकहिताचे असे काहीच नसून सरकारला काहीही व्हिजन नसल्याची टीका काँग्रेसने बुधवारी लोकसभेत केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. नोटाबंदीवरूनही सरकारवर आगपाखड करताना नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सरकारने स्वकियांवरच केलेले सर्जिकल स्ट्राईक असल्याचे मोईली म्हणाले.
नोटाबंदीनंतर सारा देश त्रास सोसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या पक्षाच्या कुठल्याही नेत्याने संसदेत लोकांचा त्रास कमी करण्यासाठी काहीही केले नाही, ते फक्त बाहेर बोलत होते, मात्र उपाययोजना संसदेतून करायच्या असतात, असे यावेळी मोईलींनी भाजपाला सुनावले.
२०१५ साली पाकिस्तानने भ्रष्टाचार, काळा पैसा आणि बोगस नोटा यांमुळे त्यांचे चलन बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा निर्णय मोदींना पटल्याने त्यांनीही भारतात नोटाबंदी केली आणि पहिल्यांदाच भारताने पाकिस्तानचे अनुकरण केले, असे ते म्हणाले.
तर अर्थसंकल्पावरून सरकारला लक्ष्य करताना देशाला पुढे नेणारा अर्थसंकल्प गरजेचा होता, मात्र हा अर्थसंकल्प विकासाला खीळ घालणारा आहे, कारण यात काहीही लोकोपयोगी नाही, अशी टीका मोईलींनी केली. देशाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात अनेक बाबींचा समावेश करण्यात आला होता, मात्र अर्थसंकल्पात या गोष्टी दिसल्याच नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.