राज्यात होऊ घातलेल्या १० महानगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी दिले आहेत.
मुंबई- राज्यात होऊ घातलेल्या १० महानगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी दिले आहेत. येत्या काही दिवसांतच या निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर होणार असून त्यानंतर आचारसंहिता लागू होणार असल्याने सर्वपक्षीयांची लगबग वाढली आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, अकोला, अमरावती, सोलापूर या दहा महापालिकांसह काही जिल्हा परिषदांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत असून त्यापूर्वी निवडणुका घेणे आवश्यक आहे. मात्र मार्च महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा असल्याने निवडणुका फेब्रुवारीतच घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने त्यासाठी तयारीही पूर्ण केली असून संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात झालेला सत्तापालट आणि त्यानंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर जोरदार तयारी सुरू केली आहे. आयोगाची तयारी पूर्ण झाली असली, तरी राजकीस पक्षांची तयारी मात्र अजूनही पूर्ण झालेली नाही. अनेक ठिकाणी युती-आघाडी यांचे निर्णयही झालेले नसून त्यामुळे अखेरच्या दिवसांपर्यंत राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरूच राहणार आहे.