आगामी महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी राज्य निवडणूक आयोग विविध उपाय योजत आहे.
मुंबई- आगामी महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी राज्य निवडणूक आयोग विविध उपाय योजत आहे. यंदाच्या निवडणुकीत अधिकाधिक तरुणांनी मतदान करून आपला हक्क बजावावा, याकरता आता राज्य निवडणूक आयोगाने ‘डिजिटल मोहीम’ ही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेअंतर्गत चार लघुपटांच्या माध्यमातून तरुणांना मतदानाकरता प्रेरित करण्यात येणार आहे. या लघुपटांतून ‘महापालिकेची सद्यस्थिती आणि मतदानाचे महत्त्व’ सांगण्यात येणार आहे.
फँटम, एआयबी, इम्पेड आणि कॉर्डिफॉर्म यांची निर्मिती असलेले हे लघुपट ‘ऑपरेश ब्लॅक स्पॉट’ यांच्या सहकार्याने प्रदर्शित करण्यात येतील. ‘ऑपरेश ब्लॅक स्पॉट’ या संस्था मतदान नोंदणी आणि जनजागृती करण्यात पुढाकार घेत आहे.
दोन मिनिटांचे असलेले हे लघुपट ‘यू-टय़ूब’ व ऑपरेशन ब्लॅक स्पॉटच्या ‘फेसबुक’ पेजवर टाकण्यात येणार आहेत. याशिवाय चित्रपटगृहांतूनही हे चित्रपट दाखवून जनजागृती करण्यात येणार आहे. या लघुपटांच्या माध्यमातून मुंबईकरांना मतदान करण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे.
‘आम्ही हे लघुपट मतदानाच्या पाच ते सहा दिवस आधी प्रदर्शित करण्याच्या विचारात आहोत. जेणेकरून या लघुपटांचा प्रभाव मुंबईकरांवर अधिक पडेल,’ असे मत ‘ऑपरेशन ब्लॅक स्पॉट’चे मुख्य उपक्रम अधिकारी स्वराज शेट्टी यांनी दिली.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने याआधी ऑपरेशन ब्लॅक स्पॉटच्या सहकार्याने आपल्या ‘महावोटर’ मोहिमेअंतर्गत ‘ट्रू वोटर’ व ‘सीओपी’ (सिटीझन ऑन पॅट्रोल) हे दोन मोबाईल अॅप आणले आहेत. या अॅपमध्ये वोटर टूल, उमेदवाराची माहिती, निवडणूक विश्लेषण आणि मतदारांकरता मार्गदर्शन असे विविध फिचर समाविष्ट आहेत.
यातील ‘वोटर सर्च’ या फिचरमुळे मतदारांना त्यांचा वॉर्ड आणि मतदान केंद्राची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तर ‘कँडिडेट सर्च’मुळे मतदारांना त्यांच्या प्रभागाचा उमेदवार कोण आहे? हे कळणार आहे. या अॅपच्या माध्यमातून टेक्नोसॅव्ही मतदारांना मतदानाकरता प्रेरित करण्यास मदत होणार आहे.
शिवाय आजकाल फेसबुकचा मोठया प्रमाणात वापर होत असल्याने या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांचा शोध घेऊन त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्यात येऊ शकेल. म्हणूनच राज्य निवडणूक आयोग या ‘डिजिटल मोहिमे’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती स्वराज शेट्टी यांनी दिली. कारण मागील काही निवडणुकांत खूपच त्रोटक मतदान झाले होते; किमान या निवडणुकीत तरी मतदानाचा टक्का वाढवा, हा उद्देश यामागे आहे.