गेली सलग तीन वर्षे मराठवाडा, विदर्भ आदी भागांत तीव्र पाणीटंचाई होती. यंदाच्या पावसाने या भागातील अनेक धरणांचे घसे ओले झाले आहेत. पाणी काय असते. त्याचा वापर जपून कसा करावा, याची चांगलीच ‘जाण’ ग्रामीण भागातील जनतेला आलेली आहे. शहरी भागातील जनतेला मात्र ती अद्यापही आलेली नाही. अशातच मुंबई महानगरपालिकाही आता सजगतेने पावले टाकीत आहे. ही जलसाक्षरतेची मोहीम राज्यातील इतर महापालिकांनीही राबवल्यास जानेवारीपासून सुरू होणा-या टँकरपासून सुटका होऊ शकते.
राजस्थान असो वा ज्या राज्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे, तिथे पाण्याचा वापर अगदी जपून केला जातो. किंबहुना पावसाळ्यात पडणारे पाणी वाया जाऊ नये याची सोय केलेली असते. त्यामुळे या राज्यांमध्ये महाराष्ट्रासारखी पाणीटंचाई नसते. किंबहुना जानेवारी महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठाही होत नाही. ही पाण्याविषयीची सजगता देशातील प्रत्येक नागरिकाने बाळगली पाहिजे. पण आपल्याकडे पावसाचे पाणी साठवण्याची मानसिकता अजूनही मूळ धरू शकलेली नाही. त्यामुळेच की काय पावसाळा गेल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होते.
देशातील सगळ्यात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेने यंदा मात्र पाणी बचतीचा निर्णय घेतला आहे. तोही पावसाळी पाण्याचा. यंदा पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी भातसा, तानसा, मोडकसागर ही धरणे तुडुंब भरलेली आहेत. धरणे भरल्यानंतर पाणी सोडण्यात येते. असे या धरणांतून प्रतिदिन ४ कोटी लिटर पाणी सोडण्यात येते. ते नंतर वाया जाते. त्यामुळे महापालिकेने या पाण्याची साठवण करण्याचे ठरवले असून त्यासाठी ६ कोटी लिटर क्षमतेचे पुनप्र्रक्रिया केंद्र बनवण्यात येत आहे.
येत्या ऑक्टोबरपासून ते कार्यान्वित करण्याचा महापालिकेचा मानस आहे. पाणी साठवण्याची ही मोहीम महापालिकेने सुरू केल्यानंतर महानगरपालिकेकडे अतिरिक्त पाणी राहणार आहे. त्यामुळे कदाचित डिसेंबर, जानेवारीपासून करण्यात येणारी पाणीकपात काही टक्के कमी करता येणार आहे.
भारतात पावसाळी पाणी साठवण्यासाठी राजे-रजवाडय़ांनी व्यवस्था केल्याचे आपल्या निदर्शनास येते. शाहू महाराज असो किंवा अंबर मलिक यांनी पाण्याच्या साठवणुकीसाठी हौद, मोठ-मोठी तळी शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधलेली होती. त्याचा वापर मराठवाडयातील जनतेने केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरला शाहू महाराजांच्या जलनियोजनाचा फायदाच झालेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी पावसाळी पाणी वर्षभर साठवण्यासाठी पाणी योजना विकसित केली होती. त्याचा वापर वर्षभर जनतेला करता येत होता. महात्मा फुले यांनी मृद्संधारणाचा आग्रह धरून पाण्याचे वॉटरटेबल संतुलित ठेवण्याचा सल्ला दिलेला होता. पण काळ जसजसा बदलत आहे तसतसा माणूस अधिक बेफिकीर होऊ लागला आहे. त्याचे पर्यवसान दुष्काळात होत आहे.
नद्या, नाल्यांचा गाळ अनेक वर्षे काढण्यात न आल्याने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटलेले आहेत. मराठवाडयात ‘नाम’ व अन्य स्वयंसेवी संस्थांनी या आटलेल्या स्रेतांच्या भोवतीचा गाळ काढल्यानेच यंदा मराठवाडयातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. निसर्ग आपल्याला भरपूर देत असतो. फक्त ते घेण्याची मानसिकता मानवात नसेल तर निसर्गही मानवाच्या विरोधात जातो, हे आपण गेल्या दोन-तीन वर्षापासून विदर्भ-मराठवाडयातील अवर्षणग्रस्त भागावरून पाहिलेले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने जलसाक्षरतेच्या दिशेने टाकलेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे.