काळा पैसा जमा करणा-यांविरोधात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने धडक कारवाई सुरू केली आहे.
नवी दिल्ली- काळा पैसा जमा करणा-यांविरोधात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने धडक कारवाई सुरू केली आहे. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)च्या अधिका-यांनी देशात आज एकाच वेळी ३०० बोगस कंपन्यांच्या ठिकाणांवर छापे टाकत दणका दिला आहे.
विश्वज्योती रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या हैदराबादच्या कंपनीसह इतर कंपन्यांवरही छापे टाकले आहेत. यात छाप्यांमध्ये आतापर्यंत ३.०४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
काळा पैसा घोषित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपताच आज ईडीने देशभरात कारवाई सुरू केली आहे. मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे.
नोटाबंदीमुळे पैसा गुंतवण्याच्या नावाखाली अनेक बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या आणि या कंपन्यांमार्फत परदेशात मोठय़ा प्रमाणात पैसा पाठवला गेला, असा ईडीला संशय आहे.
देशभरात छापासत्र भुजबळ यांचे नाव पुन्हा चर्चेत
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या प्रकरणात छगन भुजबळ यांचे नावही समोर येत आहे. मुंबईत टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये एका व्यक्तीच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांत छगन भुजबळ यांना पैसे दिल्याची नोंद करण्यात आलेली आढळल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.