हे सरकार ‘सैरा-वैरा’ झालेले आहे. कोणाचे कोणाला सुधरत नाही. कोणी कुणाला जुमानत नाही. राज्यात काय चालले आहे हे सरकारला माहिती नाही, मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, गृहमंत्र्यांना माहिती नाही, पोलीस खात्याच्या प्रमुखांना माहिती नाही; आणि वृत्तपत्रात वाचल्याशिवाय लोकांनाही काही समजत नाही.
या राज्याची इतकी दयनीय अवस्था यापूर्वी कधीही झालेली नव्हती. पोलीस, पोलीस खाते आणि सरकार यांचे अवमूल्यन इतक्या राजरोसपणे करण्याचे धारिष्टय़ समाजातील कुणालाही नव्हते. सरकारचा धाक होता, दरारा होता; अगदी जेव्हा १९९५-१९९९ या काळात याच सेना-भाजपा युतीचे राज्य होते, त्या काळात जो दरारा होता त्याचा आता मागमूसही नाही.
समाजात धटिंगणपणे वावरणा-यांचा त्यावेळी कसा ‘गेम’ केला गेला आणि राज्य कसे सुरळीत चालत होते. मात्र आजची परिस्थिती भयानक आहे. ज्या बाबासाहेब भोसले यांची वारंवार राजकीय टिंगल झाली, त्या बाबासाहेब भोसले यांचे राज्यसुद्धा खूप खूप बरे होते. बाकी जेवढे मुख्यमंत्री झाले त्या प्रत्येकाने काही ना काही विशेष केले. सरकारची पत सांभाळली, दरारा केला, सरकारचा धाक राहिला, पोलीस खात्याचा धाक राहिला. इंडियन पीनल कोर्ट? (आयपीसीएल)ची भीती होती.
आताचे सगळेच चित्र उलटे झालेले आहे. त्याच्या खोलात गेल्याशिवाय ही स्थिती का आली हे समजणार नाही. पण त्यासाठी फार खोलात जायची गरज नाही. सध्याचे सरकार हेच या सगळ्या अनास्थेला कारणीभूत आहे. जेव्हा सरकारात बसलेले आणि सरकारच्या पक्षाचे लोक ‘आता आमचे कोण काय वाकडे करू शकणार आहे..’ असा उन्माद समाजात निर्माण करतात, त्यावेळी सरकार सैरा-वैरा होते..
आज नेमकी तीच अवस्था आहे. भाजपाच्या समजणा-या कार्यकर्त्यांना एक माज आलेला आहे. आमचे कोण काय वाकडे करू शकतो.. अशी ती मिजास आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील पोलीस निरीक्षक विद्यानंद काळे यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. तशी लेखी तक्रार या राज्यातील एक जबाबदार पोलीस अधिकारी आपल्या वरिष्ठांकडे करतो.
जो आमदार धमकावत आहे तो भाजपाचा आहे. गुंड कंपनी आणि बेकायदा काम करणारे बिल्डर यांचा तो ठेकेदार आहे. त्यात बदमाश कंपनीला संरक्षण द्यावे, यासाठी या पोलीस निरीक्षकावर भाजपाचा आमदार दबाव आणतोय, अशी लेखी तक्रार विद्यानंद काळे या पोलीस निरीक्षकाने आपल्या वरिष्ठांकडे केलेली आहे. ही गोष्ट या सरकारला गंभीर वाटत नाही. पाणी इथेच मुरते आहे.
भाजपाचा आमदार असो, भाजपाचा कार्यकर्ता असो, आपल्या हातात कायदा घेण्याचा अधिकार आता आपल्याला मिळालेला आहे, अशा भ्रमात ही माणसे वावरत आहेत. कल्याणमध्ये ज्या पोलीस अधिका-याला तलावात डुंबवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न केला, ते कोणत्या पक्षाचे आहेत? मुख्यमंत्री हे स्पष्ट करू शकतील का? भाजपाचे दुपट्टे घालून ते वावरत होते. जेव्हा पोलीस अधिका-याने त्यांना हटकले तेव्हा त्या अधिका-याला थेट तलावात ढकलून देईपर्यंत आणि पाण्यात दाबून ठेवून गुदमरून मारण्यापर्यंत या पोलिसावर प्रयोग करण्यात आला. नाशिकमध्ये पोलीस अधिका-याला लोकांनी मारहाण केली. वाहतूक पोलीस अधिका-यांचे मरण तर डोळ्यासमोरच घडले आहे.
जेव्हा पोलिसांचा धाक संपतो याचा दुसरा अर्थ सरकारचाच धाक संपतो. जेव्हा पोलिसांवर हात टाकेपर्यंत समाजातील धटिंगण मुजोर होतात तेव्हा या राज्यात अराजक सुरू झाले आहे, असे खुशाल समजावे. त्या अराजकाची सुरुवात झालेली आहे. सध्या ते अदृश्य अराजक आहे. मात्र जे काही चालले आहे ते सरकार नावाच्या वस्तूला शोभणारे नाही. काँग्रेसच्या राज्यात असे घडले असते तर हेच फडणवीस, हेच तावडे, तेच मुनगंटीवार यांनी केवढा थयथयाट केला असता..
एका पोलीस हवालदाराचा मृत्यू त्याच्यावर हल्ला झाल्यामुळे झालेला आहे. एक पोलीस अधिकारी डुंबता डुंबता वाचलेला आहे. एका पोलीस अधिका-याला आमदार धमक्या देत आहे. चारचाकी गाडी चालवणारा वाहतूक पोलिसाच्या मनगटाचा चावा घेऊन पळून जात आहे.. काय राज्याची छान अवस्था आहे.. असे राज्य कुठेही नाही हो.. सगळ्यात विनोदी भाग असा की, राज्याचे मुख्यमंत्री घटना घडल्यानंतर ४८ तासांनी सांगतात की, लवकरात लवकर कारवाई करू, आरोपींना पकडू, खटले चालवू..
मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाचे बाहेर हसू होत आहे. तिकडे सरकारात बसलेले शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे नाटक करतात; आणि पोलिसांवर हात उगारणे खपवून घेतले जाणार नाही, अशा मुलाखती देतात.. अरे, तुम्ही सरकारात बसलेले आहात.. इशारे कसले देत बसता? पण शिवसेनेचा यात डबल गेम आहे. एकीकडे ‘हे मुख्यमंत्री फारच चांगले आहेत हो..’ असा फलक ‘सामना’त लावायचा आणि दुसरीकडे मागणी करायची की, गृहखात्याला स्वतंत्र मंत्री हवा आहे. या मुख्यमंत्र्याला राज्य चालवणे झेपत नाही.
आता शिवसेनेचा डोळा गृहखात्यावर आहे. पण सेनेकडे गृहखाते नव्हते का? गजाभाऊ आठवतात ना.. त्यांनी काय दिवे लावले? तर आता सेनेकडे गृहखाते गेल्यामुळे सेना २४ तासांत काही चमत्कार करेल हाही भ्रम आहे. याच सरकारला लोक आता जुमानत नाहीत. सरकारचा धाक राहिलेला नाही, सरकारला प्रतिष्ठा राहिलेली नाही, २०-२० भ्रष्ट मंत्री ज्या मंत्रिमंडळात आहेत त्या सरकारचा धाक काय राहणार आहे हो? ज्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर सीबीआयने सत्र न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे, त्या सरकारचा धाक कसा राहू शकतो?
ज्या मंत्रिमंडळातील मंत्री शेतक-यांचे ७५ कोटी रुपये बुडवतो, त्या सरकारचा धाक राहील हे शक्य नाही. भाजपावाल्यांनी चारित्र्याची जाहिरात कितीही केली तरी आता विश्वामित्रासारखा तिरपा हात करून या भयाण परिस्थितीचे पालकत्व भाजपा सरकारला स्वीकारावेच लागेल.
आजच्या महाराष्ट्रातील या अराजकाला सर्वस्वी भाजपा, भाजपा-शिवसेनेचे सरकार हेच जबाबदार आहे. सरकार म्हणून त्यांना सरकार चालवताच येत नाही. भाषण देण्यात पटाईत असलेली ही मंडळी सरकारचे दिवाळे काढल्याशिवाय राहणार नाही. सरकारची व्हायची तेवढी बेअब्रू झाली. आता वेळ आली आहे, की या सरकारला सामान्य जनताच हिसका दाखवेल.
पण, भाजपाचे हे लोक किती डोकेबाज आहेत ते बघा.. सध्या गणपतीची स्थापना झालेल्या प्रत्येक ठिकाणी या भाजपावाल्यांनी एक फलक लावलेला आहे. त्या फलकावर फोटो आहेत.. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांचे; आणि कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघालेले एक वाक्य त्यावर लिहिले आहे..
‘स्वराज्य ते सुराज्य’.. उद्देश काय? तर असे भासवत आहेत की, स्वराज्य आम्हीच आणले आणि सुराज्य आम्हीच करणार.. सुराज्य शब्दसुद्धा ज्यांना लिहिता येत नाही त्यांनीच या राज्याची वाट लावून टाकलेली आहे. त्यांच्याच राज्यात त्यांचाच पोलीस सुरक्षित नाही, आणि हे म्हणे जनतेची सुरक्षा करणार!