राज्यातील दहा महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आठ जागांवर विजय मिळविला आहे.
मुंबई- राज्यातील दहा महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आठ जागांवर विजय मिळविला आहे. तर प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या मुंबईची अवस्था त्रिशंकू झालेली आहे. ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या गेलेल्या दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांचा निकाल हाती आला आहे. दहा पैकी पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, अमरावती, अकोला, उल्हासनगर आणि नाशिक या आठ महापालिकेवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळविला आहे. ठाणे महापालिका शिवसेनेने एकहाती जिंकली असून मुंबईत त्रिशंकू अवस्था झाली आहे.
गेला महिनाभर प्रचाराच्या तोफा दणाणत होत्या. या निवडणुकीत अनेकांना धक्का बसला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांना फारसे यश आले नाही.
पुणे महापालिकेत १६२ पैकी ९४ जागा जिंकून भाजपाने संपूर्ण बहुमत मिळविले आहे. या महापालिकेत अगोदर सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला केवळ ४० जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला अकरा जागांवर विजय मिळाला. पिंपरी-चिंचवडच्या १२८ जागांपैकी ७८ जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसला ३५ जागा मिळाल्या तर शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळविला आहे.
मुख्यमंत्र्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणा-या नागपूरची सत्ता अपेक्षेप्रमाणे भाजपाने चांगल्या फरकाने राखली आहे. १५१ पैकी १०१ जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. तर काँग्रेसला केवळ २८ जागा मिळाल्या आहेत. सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांपैकी ४७ जागांवर विजय मिळवून भाजपा सत्तेच्या जवळ आहे.
अपक्षांना सोबत घेऊन इथे त्यांची सत्ता येऊ शकते. इथे काँग्रेसला १४ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला २० जागा मिळाल्या आहेत. उमेदवारीसाठी पैसे घेतल्याची चर्चा असणा-या नाशिकमध्येही भाजपाने १२२ पैकी ६७ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर उल्हासनगरमधील ७८ जागांपैकी ३२ जागा भाजपाला मिळाल्या आहेत. ओमी कलानीशी तेथे त्यांची आघाडी होती. त्यांना बरोबर घेऊन उल्हासनगरमध्ये भाजपाची सत्ता स्थापन होऊ शकते.
अमरावती महापालिकेच्या ८७ जागांपैकी ४५ जागा भाजपाने जिंकून एकहाती सत्ता मिळविली आहे. तर अकोला महापालिकेतील ८० पैकी ४५ जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. एकंदरच महापालिकेत भाजपाने घेतलेली मुसंडी सर्वानाच थक्क करून सोडणारी आहे.
मुख्यमंत्र्यांनी मानले मतदारांचे आभार!
महापालिकांपैकी आठ महापालिकांवर विजय मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानले. भाजपा सरकारने केलेल्या विकास कामावर जनतेने मोहर उमटविली आहे, असेही ते म्हणाले. मुंबईसह राज्यभरातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निकाल गुरुवारी लागले. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
मुंबई महापालिकेत प्रचंड यश मिळाले. या यशाबद्दल जनतेसह कार्यकर्त्यांंचेही त्यांनी आभार मानले. नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव, सोलापूर, नाशिकमध्येही जिंकलो आहोत.
महापालिकेच्या १०६६ जागांपैकी ५२१ जागांवर विजय मिळवला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीत जळगावात एकहाती सत्ता आणली, तर लातूर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातही भाजप पोहोचला. म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असे मुख्यमंत्री म्हणाले.