देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून ५० किलोमीटर अंतरावरील आदिवासी समाज वस्ती मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.
भिवंडी- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून ५० किलोमीटर अंतरावरील आदिवासी समाज वस्ती मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या खडवली रस्त्यावरील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी आदिवासी पाडय़ांची यापेक्षा वेगळी कहाणी नाही. तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीत नदीकाठी राहणाऱ्या १७ कुटुंबांची वस्ती असलेला कातकरी आदिवासी पाडा आहे. येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेताच्या बांधावरील चिखल तुडवीत यांना चार महिने मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे एक किलोमीटर अंतरावरील शाळेत पावसाळ्यात जाण्यास येथील विद्यार्थी टाळाटाळ करतात. तर वस्तीत एक ते सहा वर्ष गटातील १२ मुले असतानासुद्धा या ठिकाणी अंगणवाडीची व्यवस्था एक किलोमीटर अंतरावर असल्याने विद्यार्थ्यांना पोषक आहार देण्यासाठी अंगणवाडी सेविका या कातकरी पाडय़ावर फिरकत नाहीत.
येथील सर्व कुटुंबीयांची घरे कारवीच्या कुडाची असून त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आजपर्यंत घरकुल योजेचा फायदा मिळवून देण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे. या बाबत भिवंडी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची ग्रामस्थांसह भेट घेऊन या बाबींकडे लक्ष वेधले असून येत्या दहा दिवसांत या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. सुनील लोणे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या वतीने या कातकरी वस्तीवरील मूलभूत सुविधांसाठी खर्च होणे गरजेचे असताना पूर्वग्रहदूषित विचाराने या मूळ भूमिपुत्रांना सुविधां पासून वंचित ठेवत असल्याचा आरोप केला आहे.
[EPSB]
मुलांमधील संसर्ग रोखण्याकरिता..
[/EPSB]