रायगड जिल्ह्यात सध्या पीक परिस्थिती चांगली आहे; परंतु काही भागात भात शेतीवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे.
अलिबाग- रायगड जिल्ह्यात सध्या पीक परिस्थिती चांगली आहे; परंतु काही भागात भात शेतीवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने ओढ दिल्यास पिकावर कीडरोगांचा देखील प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९० पाऊस पडला आहे. त्यामुळे पीक परिस्थिती समाधानकारक आहे. हळवे प्रकारातील भातपीक सध्या लोंब्या येण्याच्या अवस्थेत आहे. तर गरव्या आणि निमगरव्या जातीचे भात वाढीच्या अवस्थेत आहे. पिकाची वाढ जोमाने होत असली तरी काही भागात बुरशीजन्य करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली असल्याचे कृषी विभागाकडून करण्यात येणा-या पाहणीत आढळून आले आहे. पावसाने ओढ दिल्यास कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाकडून कीडरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्रॉपस्वॅप योजना राबविली जात आहे. यासाठी २५ स्काऊट्स आणि ४ सुपरवायझर्सची नेमणूक करण्यात आली आहे. दर आठवडय़ाला या स्काऊट्सच्या मदतीने पीक परिस्थितीचे सर्वेक्षण केले जात आहे. कीडरोग प्रादुर्भावाची पाहणी करून त्याबाबतचा ऑनलाईन अहवाल सादर केला जात आहे. या अहवालावर कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी सल्ले प्राप्त होत आहेत. कीड रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना शेतक-यांना दिल्या जात आहेत.
करपा : रोपावस्था ते पीक फुलो-यावर येईपर्यंत पानांवर सुरुवातीला करडय़ा रंगाचे ठिपके दिसतात. नंतर ते वाढत जाऊन दोन्ही बाजूला निमुळते व मध्ये उग्र होतात. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नत्र खताचा योग्य वापर करावा, अतिरिक्त वापर टाळावा. नियंत्रणासाठी ट्रायक्लाझोल ७५ टक्के ६ ग्रॅम किंवा कार्बनडेन्झीम ५० टक्के १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी.
पिवळ्या खोडकिडा : लावणीनंतर शेतात ५ टक्के कीडग्रस्त फुटवे आढळल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज आढळल्यास किंवा प्रकाश पिंज-यात या किडीच्या पतंगांची संख्या सतत पाच दिवस वाढत्या क्रमाने आढळल्यास वेळोवेळी कीडग्रस्त फुटवे अथवा पळीज काढून टाकावेत. शेतात कडूलिंबयुक्त कीटकनाशके वापरावीत. २५ टक्के प्रवाही क्विनॉलफॉस २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा फिप्रोनील ०.३ जी १० किलो प्रति एकरप्रमाणे शेतात फेकून टाकावे.
जिल्ह्यातील भात पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. पाणथळ जमिनींमध्ये करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. शेतक-यांनी कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार कीडरोग प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी.
– पांडुरंग सिगेदार,
कृषी अधीक्षक, रायगड
[EPSB]
अमेरिकन ओपनला मिळाली नवी विजेती
[/EPSB]