भाज्यांच्या दरवाढीने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. चढे असलेल्या भाज्यांच्या दराचा तोरा आता तीस ते चाळीस टक्क्यांनी खाली उतरला आहे. हिरव्यागार,ताज्या तजेलदार भाज्या आता माफक किंमतीमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.
मुंबई- भाज्यांच्या दरवाढीने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. चढे असलेल्या भाज्यांच्या दराचा तोरा आता तीस ते चाळीस टक्क्यांनी खाली उतरला आहे. हिरव्यागार, ताज्या तजेलदार भाज्या आता माफक किंमतीमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. ब्रेक घेतलेल्या पुन्हा हजेरी लावल्यामुळे भाज्यांच्या किंमतीची उतरंड सुरू झाली आहे. पावसामुळे भाजीबाजारांमध्ये मालाला उठाव नाही, त्याशिवाय पाण्यामुळे भाज्या खराब होतील म्हणून कोणत्याही भाज्या खराब होण्यापेक्षा तुलनेने कमी किमतीमध्ये देण्याचा पर्याय विक्रेत्यांनी स्वीकारला आहे.
रविवारी नवी मुंबईचा घाऊक बाजार बंद असला तरीही त्यापूर्वी दोन दिवस, शुक्रवारी शनिवारी भाज्यांची आवकही चांगली झाली. या मालाला पावसामुळे चांगला उठाव मिळाला नसल्याने शिल्लकमध्येही बराच भाजीपाला राहिला आहे. सोमवारी पाचशे साडेपाचशे गाडय़ांची आवक झाल्याने मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असलेल्या या भाज्यांचे दर अजूनही खाली येतील अशी अपेक्षा घाऊक भाजीपाला बाजारातील व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.
पाऊस झाल्यामुळे राज्याच्या इतर ठिकाणी केलेली लागवडही चांगली झाली आहे, त्यामुळे भाजीपाला उत्तम व भरघोस प्रमाणात येत आहे. टोमॅटोवरच्या किडीवरही उतारा मिळाल्याने टोमॅटोचे उत्पादनही समाधानकारक येत असल्याने मधल्या काळात वधारलेल्या किंमतीही खाली उतरल्या आहे. घाऊक बाजारात वाटाणा व घेवडा वगळता अन्य भाज्यांच्या किंमती बारा ते पंधरा रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. एरवी घाऊक बाजारात भाज्यांच्या किमती उतरल्या तरीही किरकोळ बाजारांत या किंमती चढय़ा असतात. मात्र यावेळी तसे चित्र दिसतन नाही.
किरकोळ बाजारांमध्येही किंमती खाली उतरल्या असून ऐंशी ते साठ रुपये किलो असलेल्या भाज्या उपनगरातील बाजारांमध्ये तीस ते पस्तीस रुपये किलोच्या घरात आलेल्या आहे. नवरात्री सुरू झाल्यानंतर अनेकांचे उपवास सुरू होतात. अशावेळी उपवासाचे पदार्थ, रताळी खाण्याचा कल अधिक असतो. त्यामुळे ताज्या भाज्यांची मागणीही यावेळी मोठय़ा प्रमाणात नसते. त्याचाही परिणाम दस-यापर्यंत भाजीबाजारावर दिसून येईल व दर थोडे अधिक खाली उतरतील अशी शक्यता घाऊक भाजीपाला विक्रेते व्यक्त करत आहेत.
[EPSB]
बालकांना पोषण आहारापासून वंचित ठेवू नका!- पंकजा मुंडे
अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनवाढीबाबत सरकार सकारात्मक आहे. मानधनवाढीसंदर्भात प्रस्ताव वित्त विभागाकडे सुपूर्द केला आहे, त्यावर कार्यवाही सुरू आहे.
[/EPSB]