नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. अर्थात निवडणूक म्हटल्यावर प्रचारयंत्रणा आलीच. त्यामुळे सगळीकडे कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. आपापल्या उमेदवारासाठी कुणी जीवाचं रान करत होतं तर कुणी जीवाची मुंबई करण्याच्या मागे होतं. अर्थात प्रत्येक निवडणुकीत बांबरवाडीच्या ठरावीक कार्यकर्त्यांना रानापेक्षा मुंबईचं महत्त्व अधिक होतं. कारण रान त्यांच्या आजूबाजूलाच होतं.
कुठलीही निवडणूक जाहीर झाली की, बांबरवाडीच्या विश्वनाथ पराडकर, कानू गांवकर, किशोर पेटकर, बापू दांडेकर, शानू मोंडकर, नानू मालवणकर या कार्यकर्त्यांना एकदम हत्तीचं बळ येत असे. कोणा एका पक्षाशी त्यांनी कधीच बांधिलकी ठेवली नाही. उमेदवाराच्या आर्थिक परिस्थितीवरच त्यांचा उमेदवार ठरायचा आणि त्या उमेदवाराच्या देण्या-घेण्याच्या वृत्तीवरून प्रचाराची रणनीती निश्चित व्हायची.
या निवडणुकीत एका खास बैठकीत त्यांनी आपला जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडला आणि उमेदवाराबरोबरच तालुक्याच्या पदाधिका-यांशी संपर्क साधून बांबरवाडी व आजूबाजूच्या गावांची प्रचार यंत्रणा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली.
दोन रिक्षा, त्या रिक्षाचे प्रत्येक दिवसाचे भाडे, सहा जणांचे २०० रुपयांप्रमाणे मानधन, नाश्ता-पाणी आणि रिक्षाच्या भाडय़ात अॅडजस्ट करून प्रत्येकाचं व्यसन असा व्यावहारिक आकडा त्यांना कळविण्यात आला. आपले कमिशन काढून वाढविलेला आकडा तालुक्याच्या मुख्य पदाधिका-यांनी वरून पास करून घेतला आणि दोन रिक्षा घेऊन बांबरवाडीच्या या कार्यकर्त्यांचा धुवाधार प्रचार सुरू झाला.
डोक्यावर उमेदवाराचं छायाचित्र असलेली टोपी, छातीवर निशाणीचा बिल्ला आणि हातात आश्वासनाच्या छापील पत्रिका घेऊन धुरळा उडवत या कार्यकर्त्यांच्या दोन रिक्षा गावागावात फिरू लागल्या. सकाळी एकत्र जमणे, त्यानंतर नाश्ता-पाणी, दुपारचं जेवण, जेवणाअगोदर प्रत्येकाच्या निवडीप्रमाणे डॉक्टर-डी. एस. पी.ची भेट वगैरे सगळं सांभाळून सायंकाळी पाच वाजताच त्यांना थकवा यायचा. त्यामुळे प्रचाराला फक्त दोन ते तीन तासच मिळत. या वेळेतही दिवसाला जेमतेम सात-आठच घरे होत असत.
कारण एखाद्या घरात भेट दिल्यावर त्याच्या घरातील माणसांची खुशाली, कुणी आजारी असेल तर त्याची चौकशी, मुंबईमध्ये राहणा-या चाकरमान्याची विचारपूस, दिलंच तर चहापाणी, विडी-काडी, पान-तंबाखू यामुळे नाही म्हटलं तरी एका घरात पंधरा-वीस मिनिटे जायचीच.
एकंदर त्यांच्या मनाप्रमाणे प्रचार चालला होता. असं असतानाच सहाव्या दिवशी किशोर पेटकर आजारी पडला. घरी पाहुणे आल्याने रात्री घ्यायला मिळणार नाही या सद्हेतूने त्याने प्रचार चालू असतानाच दुपारी डॉक्टर ब्रँडीचे दोन पेग जास्त घेतले. तापत्या उन्हात ते त्याला भारी पडले. चक्कर आली. ‘डॉक्टर’मुळेच त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले. अर्थात कार्यकर्ता आजारी पडल्याची खबर वरती कळविण्यात आली. हाडाचा कार्यकर्ता असल्याचे बाकीच्यांनी तालुक्याच्या पदाधिका-यांना कळविल्याने सगळे जण लगेच धावून आले. खरं तर किशोरला काही मोठं आजारपण नव्हतं.
दुपारचे दोन जादा पेग आणि कडक ऊन यामुळे चक्कर आली एवढंच! पण एकंदर त्याच्यासाठी आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मॉब बघून डॉक्टरने संधी साधली आणि बाराशे रुपयाचं बिल त्यांच्या हातात दिलं. एक इंजेक्शनचा बॉक्स, काही गोळय़ा देऊन त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. जवळच्या डॉक्टरकडून रोज सकाळी एक इंजेक्शन घ्यायला सांगितलं. त्या डॉक्टरचं इंजेक्शन मारण्याचं शुल्क सुद्धा किशोरला अॅडवान्स देण्यात आलं. पण आजारपणच काही नसल्याने दुस-या दिवशी सकाळी किशोर ठणठणीत झाला. तरी पण इंजेक्शन घ्यायला तो गावातल्या एका डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे इंजेक्शन दिल्यावर डॉक्टरने त्याला विचारलं,
‘तुझ्याकडे अजून एखादं इंजेक्शन आहे का?’
‘कित्या वो?’ किशोरने भाबडेपणाने विचारलं.
‘नाही म्हणजे, माझ्याकडे असलेली यातली इंजेक्शन्स संपली आहेत आणि माझ्या एका पेशंटला आज एक इंजेक्शन द्यायचं आहे, म्हणून विचारतो. त्याचे पैसे मी तुला देतो.’
‘डाक्टर, खरा सांगाचा तर माका आता लय बरा वाटता. त्येच्यामुळा इंजीक्शनची माका कायव गरज नाया. असलो एक बॉक्सच माज्याकडे आसा. तुमी म्हणतास तर आता लगेच तो तुमका हाडून देतंय. अर्धी किंमत माका देवा.’ किशोरने व्यवहाराचं बोलून टाकलं.
‘ठीक आहे. मग आता हे इंजेक्शन तुला देऊ ना?’
‘आता इल्यासारका याक देव्न टाका. त्या डाक्टरचो पन अपमान नुको.’ किशोर पेटकरने एक पैसाही न देता त्या डॉक्टरकडून एक इंजेक्शन मारून घेतलं आणि लगेच घरी जाऊन इंजेक्शनचा बॉक्स आणून त्या डॉक्टरला दिला. अध्र्या किंमतीप्रमाणे त्याचे चारशे ऐंशी रुपये झाले. ते चारशे ऐंशी रुपये आणि रोज इंजेक्शन मारण्याचे दिलेले तीनशे रुपये असे एकून सातशे ऐंशी रुपये किशोरने बाजूला करून ठेवले आणि दुस-या दिवसापासून पुन्हा प्रचारामध्ये सामील झाला.
आजारी असूनही किशोरने पक्षाच्या प्रेमापोटी प्रचारकार्याला झोकून दिल्याचं कळल्यावर तालुक्याच्या पदाधिका-यांना त्याचा विशेष अभिमान वाटला आणि दोनशे ऐवजी तीनशे रुपये असा वाढीव रोज त्याला देण्यात आला. त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत आजारी किशोरला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून रिक्षातून न उतरता प्रचारामध्ये सवलत देण्यात आली. या निवडणुकीच्या प्रचारात किशोर पेटकरने स्वत:ला त्रास करून न घेता फक्त रिक्षातून फिरण्याचे इतरांपेक्षा पाचशे रुपये जादा कमवले. दरम्यान, या कार्यकर्त्यांचा उमेदवार निकालावेळी मोठय़ा फरकाने पडला आणि थोडा कर्जबाजारीही झाला. पण उमेदवाराचे ‘सच्चे’ कार्यकर्ते सध्या मिळालेल्या मानधनात आपली संध्याकाळ मजेत घालवत आहेत.