चाळीसगावपासून अवघ्या चार कि.मी. अंतरावरील खडकी बुद्रुक येथील एका नऊ वर्षीय मुलीवर गावगुंडांनी बलात्कार करून तिची क्रूर पद्धतीने हत्या केल्याच्या घटनेला चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.
मुंबई- चाळीसगावपासून अवघ्या चार कि.मी. अंतरावरील खडकी बुद्रुक येथील एका नऊ वर्षीय मुलीवर गावगुंडांनी बलात्कार करून तिची क्रूर पद्धतीने हत्या केल्याच्या घटनेला चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात आलेला नाही.
या अपयशाचे खापर स्थानिक पोलिसांकडून मुलींच्या वडिलांसह मामा, काका यांच्यावर फोडण्यासाठी त्यांची छळवणूक सुरू आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम चाळीसगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी करत आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी व न्यायासाठी संपूर्ण कुटुंब मागील १७ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहे.
चाळीसगाव खडकी बुद्रुक गावात मातंग समाजाचे एकच घर असल्याने आपल्या मुलीचा जीव गेला असतानाही एकीकडे पोलिसांचा छळ व दुसरीकडे या प्रकरणात गावगुंडाची दहशत यामुळे घर सोडून संपूर्ण कुटुंब व नातेवाईक आझाद मैदानात न्यायासाठी बसले आहेत. मात्र १७ दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारचा प्रतिनिधी आंदोलनकर्त्यांकडे फिरकलेला नाही. मुंबईत जगण्यासाठी या कुटुंबीयांना ठिकठिकाणी भीक मागून आपली गुजराण करून न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे.
खडकी बुद्र्रुक येथे २२ एप्रिल रोजी मध्यरात्री नऊ वर्षीय मुलीचे घरातून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला व नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र या घटनेविषयी स्थानिक पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह मामा व इतर नातेवाईकांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे करून त्यांचा आतोनात छळ केला. नात्याने मामा असलेल्या दिलीप केंदाळे याला तीन महिने तपासाच्या नावाखाली विविध गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
त्याच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याचे मुलीचे आतेभाऊ असलेल्या जीभाऊ यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात आपल्या सख्ख्या भाच्याला अटक केली आहे. त्याने जबरदस्तीने हे कृत्य केले असल्याचे कबूल कर करण्यासाठी त्याला पोलिसांकडून मारहाण केली जात आहे. यासाठी गावातील भाजपाच्या काही कार्यकर्त्यांकडून दबाव टाकला जात आहे.
आम्ही गरीब असल्याने हे प्रकरण दाबले जात आहे. आमचा संशय असलेल्यांपैकी गावातील भाजपाशी संबंधित असलेले काही गावगुंड व इतर लोक असल्याचा आरोप मुलीच्या आईकडून केला जात आहे.
आपल्याला न्याय मिळावा. या मागणीसाठी या कुटुंबाने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांपासून ते सामाजिक न्यायमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडेही पत्रव्यवहार केला. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे रोज उपासमारी व भिक्षेवर जीवन कंठण्यापेक्षा आपण न्यायासाठी सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.