हजार-पाचशेच्या नोटा बंद करायच्या आणि दोन हजाराची नोट काढायची. ही लढाई काळा पैसा रोखण्यासाठी आहे की काळा पैसा सहजरीत्या गोळा करता यावा यासाठी आहे? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
कराड- हजार-पाचशेच्या नोटा बंद करायच्या आणि दोन हजाराची नोट काढायची. ही लढाई काळा पैसा रोखण्यासाठी आहे की काळा पैसा सहजरीत्या गोळा करता यावा यासाठी आहे? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काळा पैसा रोखण्याच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणे योग्य नसल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.
पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले की, ७० हजार कोटींच्या बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी १६ हजार कोटी रुपये खर्चून नव्या नोटा छापून काय साध्य होणार. त्यापेक्षा रिझव्र्ह बँकेने नागरिकांना आपल्या पाचशे-हजारांच्या नोटा मुदत देऊन बँकेत येऊन तपासून घ्या, असे सांगितले असते तर योग्य झाले नसते का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात जो खुलासा केला; त्याचे मी जाहीर कौतुक करतो.
काळय़ा पैशांच्या लढाईविरोधात घेतलेला कोणताही निर्णय हा स्वागतार्हच पण, रिझव्र्ह बँकेने काढलेल्या पत्रकात त्यांनी जे खुलासे दिले आहेत, ते संशयास्पद आहेत. कोणतीही गोष्ट पाकिस्तानशी जोडायची आणि राष्ट्रप्रेमाचा कांगावा करायचा, हे योग्य नव्हे. जे करायचे ते शुद्ध हेतूने करा.
७० हजार कोटींच्या बनावट नोटा चलनात असल्याचे आरबीआयने पत्रकात म्हटले आहे; परंतु सर्वसामान्य जनतेला पाचशेच्या नोटा बँकेत भरा आणि दोन-चार हजारांनी काढा, असे म्हणून वेठीस धरण्याचा प्रकार घडतो आहे.
सर्वसामान्य नागरिकाला या नोटा जमा करून मिळणारे पैसे म्हणजे त्यांची फसवणूक आहे. पाचशे-हजारांच्या नोटा रद्द केल्या आणि दोन हजारांची नोट चलनात आणली. हजाराची नोटही चलनात येणार आहे. मग दोन हजारांची नोट कशासाठी? ही चलनात आणून काळे धन गोळा करणाऱ्यांची सोय साधली का, असा सवाल त्यांनी केला.