मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय तीन दिवसांत मागे न घेतल्यास आरपारची लढाई करू, असा गर्भित इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिला.
नवी दिल्ली- मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय तीन दिवसांत मागे न घेतल्यास आरपारची लढाई करू, असा गर्भित इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिला. आणीबाणीच्या काळातही अशी मुस्कटदाबी झाली नव्हती, असे दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
येथे आझादपूर घाऊक फळ व भाजी मार्केटमध्ये आयोजित केलेल्या रॅलीत या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात रणशिंग फुंकले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे.
मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांचे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठीच ही नोटाबंदीची मोहीम हाती घेतली आहे. या नोटीबंदीतून जवळपास १० लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. काळ्यापैशाचा बाजारपेठेत पुन्हा पूर येऊ लागला आहे. काही जणांना घरी जाऊन नोटा दिल्या जात आहेत. १० लाख कोटी रुपये बॅँकेत जमा करण्यासाठी जनतेवर दबाव आणला जात आहे.
प्रचंड कर्ज डोक्यावर असतानाही मोदीजींनी विजय मल्ल्याला लंडनला एका रात्रीत पाठवले आणि जनतेला रस्त्यावर आणले. जनतेची फसवणूक केली जात आहे. भाजपाचे माजीमंत्री जी. जनार्दन रेड्डी यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे का मारले नाहीत. रेड्डी यांनी मुलीच्या लग्नासाठी ५०० कोटी रुपये खर्च केले.
आता सामान्य माणसाला ते लग्नासाठी २.५ लाख रुपये देत आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी केवळ अडीच लाख रुपये खर्च केले का? असा सवाल त्यांनी केला.
कोणत्याही कारवाईला घाबरणार नाही, हिंमत असेल तर तुरुंगात टाका, गोळ्या घाला मोदींवर टीका करताना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी जनतेसाठी सरकारच्या विरोधात लढतच राहणार आहे. सरकारने माझ्याविरोधात कोणतीही कारवाई करून दाखवावी. मी घाबरणार नाही. मी माझा लढा लढतच राहणार. तुमच्यात हिंमत असल्यास मला तुरुंगात टाका किंवा गोळ्या घाला, असे आव्हान त्यांनी दिले.
नोटाबंदीचा लढा हा देश वाचवण्यासाठी आहे. गरीब व उपाशी जनतेसाठी हा लढा लढत आहे. आणीबाणीच्या काळातही भारतात अशी मुस्कटदाबी झाली नव्हती, असे त्यांनी सांगितले. हा निर्णय भारताला १०० वर्षे मागे नेणारा आहे. सरकार रोज नवीन निर्णय घेऊन येत आहे. कालपर्यंत नोटा बदलताना ४५०० रुपये मिळत होते, आता केवळ दोन हजार रुपये मिळत आहेत.
मंगळवारी बोटाला शाई लावण्याचा निर्णय जाहीर केला. हे काय चालले आहे? आम्ही तुमचे नोकर आहोत काय? आम्ही चोर आहोत काय? तुम्ही तेवढे सज्जन व आम्ही प्रत्येक जण चोर असा सवाल त्यांनी केला. देशात प्लास्टिकरूपी पैशांचा वापर करावा अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे.
देशात केवळ चार टक्के व्यवहार हे कार्डने होत असतात. देशात नेहमीच रोखीचे व्यवहार होत असतात. त्यांच्यापर्यंत पैसे न पोहोचल्यास त्यांना अन्न मिळताना अडचणी निर्माण होऊ शकतात. पंतप्रधान मोदी हे सारखे परदेशात जात असतात. ते आपल्या देशातील मातीचा वास विसरले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
नोटाबंदीची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी फेटाळून लावली. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये संसदीय चौकशी समित्या नेमल्या होत्या. त्याचे काय झाले हे सर्वानाच माहिती आहे.