टिपिकल द्वितीय श्रेणी सरकारी कर्मचा-यासारखे कपडे, गळ्याला मफलर, डोळ्यांना चष्मा, पायात नोकरदाराची असते तशी चप्पल आणि हातात कसलीशी सुटकेस घेऊन फिरणारे अरिवद केजरीवाल देशाने पाहिले आहेत.
मुंबई- टिपिकल द्वितीय श्रेणी सरकारी कर्मचा-यासारखे कपडे, गळ्याला मफलर, डोळ्यांना चष्मा, पायात नोकरदाराची असते तशी चप्पल आणि हातात कसलीशी सुटकेस घेऊन फिरणारे अरिवद केजरीवाल देशाने पाहिले आहेत.
अण्णा हजारेंनी आपल्या आंदोलनाने देश चेतवला तेव्हा केजरीवालच या आंदोलनाच्या यज्ञाला फुंकर घालत होते. राळेगणसिद्धी आणि महाराष्ट्रात परिचित असलेल्या अण्णांची ओळख देशाला ज्या आंदोलनाने दिली; त्या आंदोलनानेच केजरीवालांच्या संघटन, आयोजन-नियोजनक्षमतेचे दर्शन देशाला घडवले.
मोदीलाट असतानाही दिल्लीने देशातील वा-याची दिशा बदलली. देशातला झंझावात दिल्लीने रोखून धरला. देशभरात हवा केलेल्या भाजपाचा दिल्लीत धूर काढला तो अरविंद केजरीवाल यांनी!
सत्ताधीशांशी दोन हात करत देश जिथून हाकला जातो; त्या राज्याच्या पटावर आपले नाव कोरणे सोप्पे नव्हते. पण केजरीवाल मागे हटले नाहीत. ते सामाजिक चळवळींचा चेहरा होते. डोळ्यांत सच्चेपणा, बोलण्यात स्पष्टपणा, चालण्या-बोलण्यात संयम आणि आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला होता. गल्लोनगल्ली पिंजून काढली. हातात झाडू आणि डोक्यावर टोपी घातलेले केजरीवाल पुढे देशाने पाहिले. त्यानंतर याच देशाने त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
केजरीवाल यांचा शपथविधी सुरू असताना प्रचंड गर्दीतून टाळ्यांचा आवाज घुमत होता तेव्हा एका खुर्चीवर बसून सुनीताचेही हात अलगद जोडले जात होते. तिच्याही डोळ्यांत आनंदाची, अभिमानाची चमक होती. शपथविधी झाल्यावर केजरीवालांची पावले सुनीताकडे वळली. कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघालेल्या केजरीवालांनी डोळे मिटून सुनीताला आलिंगन दिले आणि तिला धन्यवाद दिले.
पुढे कधी तरी एका मुलाखतीत केजरीवाल यांनी सुनीताची ओळख करून दिली. ‘सुनिता नसती तर माझा हा प्रवास घडला नसता. माझ्या आयुष्यातील यशाच्या व्यासपीठावर ती कधी आली नाही, पण सोबत मात्र कायम होती. तिने माझ्या हातात तिचा हात दिला तो क्षण माझ्या पुढच्या प्रवासाची नांदी ठरला.
त्या क्षणाच्या सुगंधाने माझे आयुष्य दरवळून निघाले. हा दरवळ मला भविष्यभर पुरेल. त्या क्षणापासून सुनीता अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहे. अगदी प्रत्येक क्षण. केजरीवाल यांच्या यशाचे हारतुरे तिच्या गळ्यात पडले नाहीत; पण ती ते हारतुरे कायम निस्वार्थीपणे वागवत राहिली आहे.
रूक्ष, कर्तव्यकठोर, वातट तोंडवळा असलेला केजरीवाल नावाचा माणूस प्रेमाच्या वेलीला बिलगेल असे कोणाला वाटले नाही. पण हे खरे आहे. अरिवद केजरीवाल आणि सुनिता यांची प्रेमवेल जन्माला आली आणि तिने बाळसेही धरले आहे आणि ती महाराष्ट्रातल्या नागपुरात वाढली.
मूळ हरियाणाच्या हिस्सार भागातले केजरीवाल अभ्यास-कष्ट-जिद्द-सचोटी-नियोजनाच्या बळावर आयआरएस परीक्षेत यशस्वी झाले आहेत. प्रशिक्षणासाठी केजरीवाल येऊन थडकले ते नागपुरात! सुनीताही तिथेच ट्रेनिंगला होती. केजरीवाल आणि सुनीताची ओळख तिथेच झाली.
प्रशिक्षण, अभ्यास, चर्चा करताना मनांची गुंफण आपसूक झाली. विचार जुळताहेत असे वाटू लागले. दोघांच्या मनाचा हळवा कोपरा पाझरू लागला आणि ऑरेंज सिटी नागपुरातील ट्रेनिंग सेंटरच्या गार्डनमध्ये झाडा-झुडुपांच्या, फुला-पानांच्या, आभाळ-जमीन-वारा-भोवतालाच्या साक्षीने बोच-या गुलाबी थंडीत प्रपोज सोहळा पार पडला. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या गेल्या.
एकमेकांच्या साथीने आयुष्य फुलवायचे ठरले आणि या दोघांच्या घरच्यांनीही त्यांना विरोध केला नाही. दोघांचे शुभमंगल झाले. आज एक मुलगी-एक मुलगा असा त्यांचा छोटा सुखी परिवार आनंदाने नांदत आहे. नागपुरात अरिवद केजरीवाल नावाच्या वृक्षाला बिलगलेली सुनीता नावाची वेल बहरत असून या वृक्षाला यशाचे सौंदर्य बहाल करत आहे.