सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायरी समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील १६ धोकादायक समुद्रकिनारे निश्चित करण्यात आले. या धोकादायक समुद्र किना-यांमध्ये रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिना-याचा समावेश करण्यात आला.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायरी समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील १६ धोकादायक समुद्रकिनारे निश्चित करण्यात आले. या धोकादायक समुद्र किना-यांमध्ये रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिना-याचा समावेश करण्यात आला. समुद्रकिनारी येणा-या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अद्ययावत सुविधांसह जीवरक्षक नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. परंतु, पाच महिन्यानंतरही हा प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे. प्रस्ताव तयार करून पाच महिन्यानंतरही आरेवारे समुद्रकिनारी ना जीवरक्षकाची नियुक्ती झाली आहे ना इथे वॉच टॉवर उभारण्यात आला आहे. प्रशासनाच्या उदासिन कारभाराचा फटका मात्र पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे.
रविवारी सायंकाळी आरे-वारे समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होताहोता वाचली. पुण्यातील पाच पर्यटक पर्यटनासाठी रत्नागिरीत दाखल झाले होते. रविवारी सायंकाळी पाचही पर्यटक रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनारी उतरले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाचहीजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. यावेळी भरतीच्या पाण्यात फसल्याने पाचही पर्यटक बुडाले. यातील तिघांना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले तर अन्य एकाने धाडसाने किनारा गाठला. तर एकाचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने चौघांचे प्राण वाचले असले तरी समुद्र किना-यांवरील सुरक्षितता अद्यापही वा-यावरच असल्याचे याद्वारे समोर आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायरी समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील समुद्रकिना-यांचा सुरक्षिततेसाठी प्रशासनाने पावले उचलली. समुद्रकिना-यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ५० लाखांचा स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ात जिल्ह्यातील १६ समुद्रकिना-यांचा समावेश आहे. समुद्रकिना-यांवर लाईफ जॅकटस्, वॉच टॉवर, शोध व बचाव साहित्य, अत्याधुनिक वॉटर बाईक आदी साधने पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायरी समुद्रकिनारी बेळगावच्या आठ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. एकाचवेळी आठजणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याने समुद्रकिना-यांवरील असुविधांचा प्रश्न पुढे आला. जिल्ह्यातील धोकादायक समुद्रकिनारे, पर्यटकांचा अतिउत्साह आणि किना-यांवर बुडणा-यांना वाचवण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीचा अभाव यामुळे अनेकदा पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला.
[EPSB]
पाँडिचेरीसारख्या राज्यातही अंगणवाडी सेविकांना १९ हजार रुपये मानधन देण्यात येते.
[/EPSB]