बिग बी अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या नातींना एक पत्र लिहिले होते. नव्या नवेली आणि आराध्या बच्चन यांना उद्देशून बिग बींनी हे पत्र लिहिलेले.
मुंबई- बिग बी अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या नातींना एक पत्र लिहिले होते. नव्या नवेली आणि आराध्या बच्चन यांना उद्देशून बिग बींनी हे पत्र लिहिलेले. त्यांच्या ‘पिंक’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेले हे पत्र फार गाजले होते.
बॉलिवूडचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांनी ‘त्या प्रसिद्ध परिवाराच्या केवळ वारसच नसून त्या मुलीसुद्धा आहेत. मुलगी असल्यामुळे अनेक जण त्यांना कसे जगले पाहिजे हेही सांगतील’, असे आपल्या १८ वर्षाची नात नव्या नवेली आणि चार वर्षांची नात आराध्याला पत्रात म्हटले होते.
अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची नव्या ही मुलगी आहे. तर आराध्या अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आहे.
एका कार्यक्रमादरम्यान या पत्राविषयी बोलताना अमिताभ यांनी पत्र लिहिण्याच्या कल्पनेबद्दल खुलासा केला. ‘पिंक’ची प्रसिद्धी सुरू असतानाच शूजित सरकारने अमिताभ यांना पत्र लिहिण्याची कल्पना सुचवली आणि बिग बींचे शब्द या पत्राच्या रूपात कागदावर अवतरले.
पत्र वाचताच नव्याने मला पत्राचे उत्तर दिले, असे सांगत अमिताभ यांनी नव्याचे उत्तर सर्वासमोर मांडले. ‘नानू मी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वागेन’ असे नव्या म्हणाली तर, ‘मी जे नव्याला इतकी वर्षे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्ही एका पत्रातून सांगितलं’ अशी प्रतिक्रिया श्वेताने दिली.
पत्रात बिग बींनी म्हटलेले की, ‘तुम्ही त्या लोकांचं ऐकू नका जे तुम्हाला सांगतील की कसे कपडे घातले पाहिजेत, तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुम्ही कोणाला भेटलं पाहिजे आणि तुम्ही कुठे गेलं पाहिजेत.’ तू घातलेल्या स्कर्टवरून तुझं चरित्र कळतं, असं जर कोणी तुम्हाला म्हणाले तर त्या व्यक्तीचे अजिबात ऐकू नका.
याशिवाय लग्नाबद्दल सल्ले देताना त्यांनी लिहिलेले की, ‘तुम्ही तेव्हाच लग्न करा जेव्हा तुम्हाला करावंस वाटेल. आपला मित्र-परिवार तुम्ही स्वत: निवडा याशिवाय स्वत:चे निर्णय स्वत: घ्या, लोक तुमच्याबद्दल बोलतील, पण त्यांचे ऐकू नका.’