अवघ्या महिनाभराच्या पावसातच अंबरनाथमधील सर्वच मुख्य रस्ते वाहून गेले असून मोठमोठया खड्डयांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.
अंबरनाथ- अवघ्या महिनाभराच्या पावसातच अंबरनाथमधील सर्वच मुख्य रस्ते वाहून गेले असून मोठमोठया खड्डयांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांवरुन वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. रस्त्यांवर काही फुटांच्या आकाराचे मोठ-मोठे खड्डे असल्याने वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.
अंबरनाथ शहरातील आनंदनगरमाग्रे लोकनगरीकडे येणारा रस्ता, बी केबीन रोड, कानसई परिसरात जाणारा रस्ता अशा मुख्य रस्त्यांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डयांचे मोठे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिक आणि विशेषत: महिला वर्ग, गरोदर स्त्रिया, वयस्कर नागरिक यांना याचा मोठा त्रास सोसावा लागत आहे.
खड्डयात गाडया आदळल्याने अनेकांना पाठ आणि कंबरदुखी सुरू झाली आहे. मात्र तरीही सत्ताधारी शिवसेनेसह इतर कुठल्याही पक्षाला याबाबत काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाने आत्तापर्यंत याबाबत काहीही उपायोजना केलेल्या नाहीत.
‘प्रहार’ने सोमवारी बी केबीन रोडच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने या रस्त्यावर खड्डयांमध्ये खडी टाकली असून त्यामुळे आता दुचाकी गाडयांचे अपघात होण्याची शक्यता आणखी वाढली आहे. मात्र हे बिरबलाचे डोके लावणारे मात्र आलिशान गाडयांमधून फिरत असल्याने त्यांना नागरिकांचे हाल कळतील का? असा उद्विग्न सवाल जनता विचारत आहे.
सर्वच पक्ष एका माळेचे मणी
दरम्यान, अंबरनाथ पालिकेत काँग्रेस वगळता इतर शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस असे सर्व पक्ष एकत्रितणे सत्ता उपभोगत आहेत. त्यामुळे या खड्डयांबाबत बोलायला कंणीही तयार नाही.
काही वर्षापूर्वी खड्डयांमध्ये झाडे लावणा-या आणि मासे पकडून चमकोगिरी करणा-या मनसेच्या कुठल्याही नेते, नगरसेवक किंवा पदाधिका-यांनीही याकडे लक्ष दिलेले नाही. तर खड्डयांविरोधात आंदोलन करुन गाढवाच्या गळयात ठेकेदाराची पाटी घालणारे आणि थोबाडीत मारणारे राष्ट्रवादीचे नेतेही थंड पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून मात्र संताप व्यक्त होत आहे.