हिंदू धर्मगुरूंची सर्वोच्च संस्था असलेली आखाडा परिषद खडबडून जागी झाली असून धर्माला बदनाम करणा-यांना तथाकथित १४ साधूंना भोंदूबाबा म्हणून घोषित केले आहे.
अलाहाबाद- राम रहीम याला न्यायालयाने बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरविल्यानंतर हिंदू धर्मगुरूंची सर्वोच्च संस्था असलेली आखाडा परिषद खडबडून जागी झाली असून धर्माला बदनाम करणा-यांना तथाकथित १४ साधूंना भोंदूबाबा म्हणून घोषित केले आहे. यापुढे संत ही उपाधी लावण्यासाठीची आचारसंहिताही या आखाडा परिषदेत जाहीर करण्यात आली आहे. भोंदूबाबा म्हणून जाहीर केलेल्यांमध्ये आसाराम, राम रहीम, रामपाल, निर्मल बाबा आणि राधे माँ यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली.
या बाबांविरोधात देशव्यापी बहिष्कार घालण्याचे आवाहन परिषदेकडून नागरिकांना करण्यात आले. आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या १४ भोंदूबाबांच्या यादीत बाबा गुरमित राम रहीम, आसाराम ऊर्फ आशुमल शिरमानी, आसारामचा मुलगा नारायण साई, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, निर्मल बाबा ऊर्फ निर्मलजीत सिंह, सच्चिदानंद गिरी ऊर्फ सचिन दत्ता, ओम बाबा ऊर्फ विवेकानंद झा, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमूर्ती द्विवेदी, स्वामी आसीमानंद ऊर्फ ओम नम: शिवाय बाबा, खुशी मुनी, बृहस्पती गिरी आणि मलकान गिरी या कथित बाबा-महाराजांचा समावेश आहे.
त्याचबरोबर अखिल भारतीय आखाडा परिषदेने आता ‘संत’ ही उपाधी देण्यासाठी एक प्रक्रिया निश्चित करण्याचा ठराव केला आहे. जेणेकरून भविष्यात राम रहीम सारख्या बाबांना या उपाधीचा गैरवापर करण्यापासून रोखता येईल. बाबा राम रहीमवरील बलात्काराचा गुन्ह्याचा दोषारोप सिद्ध होऊन त्याची रवानगी तुरुंगात झाल्याने हिंदू धर्माच्या धर्मगुरूंची सर्वोच्च संस्था असणा-या
अखिल भारतीय आखाडा परिषदेला हे पाऊल उचलावे लागले आहे. याबाबत विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी सांगितले की, काही जणांच्या वाईट कृत्यांमुळे सर्वच धर्मगुरूंकडे चुकीच्या दृष्टीने पाहिले जात असल्याची भावना सध्या हिंदू संतांमध्ये निर्माण झाली आहे. विहिंप आणि अखिल भारतीय आखाडा परिषद हे सोबत काम करतात. जैन पुढे म्हणाले की, संत या उपाधीचा चुकीचा वापर केला जात आहे. त्यामुळे परिषदेने ही उपाधी देण्यासाठी एक प्रक्रिया निश्चित करण्याचे ठरवले आहे.
यापुढे कोणाही व्यक्तीची पडताळणी करून त्याची छाननी केल्यानंतरच ही उपाधी प्रदान करण्यात येईल. जैन म्हणाले, ही उपाधी देण्याआधी आखाडा परिषद संबंधीत व्यक्तीची जीवनशैली कशा स्वरूपाची आहे, हे ही तपासून पाहणार आहे. त्याचबरोबर एखाद्या ‘संत’ व्यक्तीजवळ कुठल्याही स्वरूपाची रोख रक्कम अथवा त्याच्या नावावर कुठलीही संपत्ती असता कामा नये. अशी संपत्ती किंवा रोख रक्कम ही ट्रस्टच्या नावाने असायला हवी. तसेच याचा मोठा भाग हा लोकांच्या कल्याणासाठी वापरला जायला हवा. लोकांनी कुणाचे अनुयायी बनण्यापूर्वी त्यांची विश्वसनीयता पडताळून पाहणे आवश्यक आहे, असे आखाडा परिषदेच्या एका वरिष्ठ पदाधिका-याने सांगितले. अखिल भारतीय आखाडा परिषद १४ आखाडय़ांची संयुक्त संस्था आहे. यामध्ये निर्मोही आखाडय़ाचाही समावेश आहे.
[EPSB]
[/EPSB]